22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रशिवरायांची घेतलेली शपथ पूर्ण केली ; मुख्यमंत्री शिंदे

शिवरायांची घेतलेली शपथ पूर्ण केली ; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, ती पूर्ण करण्याचे काम मी केले आहे. दिलेला शब्द पाळणे हीच माझ्या कामाची पद्धत आहे. मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. आम्ही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मराठा आंदोलनाचा पेच सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोय-यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचे उपोषण आणि मराठा आंदोलन मागे घेण्यात आले.

स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नव्या अध्यादेशाची प्रत सुपुर्द केली. तसेच त्यांच्या हस्ते सरबत घेऊन जरांगे यांनी उपोषण सोडले. यानंतर उपस्थित मराठा समाजाला मुख्यमंत्री शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, मराठा समाजाने एकजूट कायम ठेवली. मराठा समाजासाठी न्याय मागणा-या मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन. मराठा समाजाने न्याय मागताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेतली, यासाठी मुख्यमंत्री म्हणून आभार मानतो. हा ऐतिहासिक क्षण आहे. मी मतांसाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत. मराठा समाजामुळे अनेकांना मोठी पदं मिळाली, पण न्याय देण्याची वेळ आली तेव्हा अनेकांनी माघार घेतली. पण आज आनंदाचा दिवस आहे. सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देणाचे काम सरकारने केले आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना नोक-या देणार
जे लोक आंदोलनात मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना आपण वा-यावर सोडणार नाही. त्यांना आपण नोक-या देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आपण कर्तव्य म्हणून त्या ८० लोकांना १० लाख रुपयांप्रमाणे मदत दिली आहे. नोक-याही देणार आहोत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR