कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी रंकाळा चौपाटीवर आलेल्या सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. यात सहा ते सात जणांनी कोयते आणि एडक्याने २० ते २५ वार करून अजय दगडू ऊर्फ रावण (वय ३०, रा. यादवनगर) याचा निर्घृण खून केला. या घटनेत आकाश सिद्धू माळी (वय १९, रा. यादवनगर) हा किरकोळ जखमी झाला. गुरुवारी (दि. ४) सायंकाळी सहाच्या सुमारास रंकाळा चौपाटीवर टॉवरजवळ खुनाची थरारक घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली.
यादवनगरातील गुंडांच्या टोळ्यांमध्ये वाद धुमसत आहे. दोन दिवसांपूर्वी आकाश माळी याच्या घरावर विरोधी टोळीतील काही तरुणांनी दगडफेक केली होती. त्यानंतर दोन गटांत वाद झाला. अक्षय माळी, रोहित शिंदे यांनी गुरुवारी दुपारी फोन करून वाद मिटवण्यासाठी अजय शिंदे, आकाश माळी यांना रंकाळा चौपाटीवर बोलवले. हल्लेखोर आधीच रंकाळा चौपाटीवर येऊन थांबले होते.
सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अजय शिंदे हा अन्य तिघांसह रंकाळा टॉवरजवळ पोहोचला. चर्चा होऊन वाद मिटण्याऐवजी वाढतच गेला.
त्यावेळी संशयित रोहित शिंदे याच्यासह सहा ते सात जणांनी अजय शिंदे याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. चेह-यावर आणि डोक्यात, वर्मी घाव लागल्याने अजय जागेवरच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या पाठीतही सपासप वार केले. तीन ते चार मिनिटे हा थरार सुरू होता. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
भरदिवसा रंकाळा चौपाटीवर झालेल्या खुनाची वार्ता शहरात वा-यासारखी पसरली. काही क्षणात जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.
सहाजण ताब्यात
अजय शिंदे खून प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांना ताब्यात घेतले. रोहित शिंदे, राहुल शिंदे, निलेश बाबर, राज जगताप, अर्जुन शिंदे अशी संशयितांची नावे आहेत.