सोलापूर : सनातन धर्म हा शब्दप्रामाण्यावर आधारित आहे; कारण आपल्या ऋषीमुनींनी जे प्रत्यक्ष अनुभवले तेच शब्दप्रमाण मानले आहे. या शब्दप्रमाणाचा आपणही अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला हवा. रामायण-महाभारत आदी ग्रंथांमध्ये शेकडो खगोलीय संदर्भ आहेत.
अमेरिका, कॅनडा या देशांतील ५००-६०० विद्यापिठांमध्ये या ग्रंथांचे अध्ययन केले जाते. युरोपात विज्ञानाची प्रगती झाली असली, तरी हे ज्ञान भारतातूनच विदेशात नेण्यात आले आहे. भारतातील समृद्ध ग्रंथांचे भाषांतर करूनच पाश्चात्त्यांनी आधुनिक विज्ञानामध्ये प्रगती केली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अमेरिका येथील इन्स्टीट्यूट ऑफ ॲडवान्स सायन्स चे डॉ. नीलेश नीळकंठ ओक यांनी केले. ते श्री रामनाथ देवस्थान , फोंडा, गोवा येथील वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा च्या उद्घाटनप्रसंगी विश्वगुरु भारताचे बलस्थान : सनातन हिंदु धर्म यावर बोलत होते.
या महोत्सवासाठी इंडोनेशिया येथील रस आचार्य डॉ. धर्मयश, आफ्रीका येथील इस्कॉन चे श्रीवास दास वनचारी, महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, इंटरनॅशनल वेदांत सोसायटी चे पू. स्वामी निर्गुणानंद पुरी, स्वामी अखंडानंद गुरुकुल आश्रमाचे संस्थापक महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती, संत रामज्ञानीदास महात्यागी महाराज, प.पू. संतोष देव महाराज, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महंत डॉ. अनिकेत शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका चे कार्याध्यक्ष. रणजित सावरकर, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांसह देशविदेशांतून हिंदू संघटनांचे ४५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत.