22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रभारताला क्रीडा महासत्ता करण्याचे ध्येय; पांडुरंग चाटे

भारताला क्रीडा महासत्ता करण्याचे ध्येय; पांडुरंग चाटे

पुणे : ‘भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असताना ऑलिम्पिकमधील पदकांची संख्या नक्कीच खटकणारी आहे. त्याचमुळे भारतातील क्रीडा संस्कृतीला सरकारच्या खेलो इंडिया, फिट इंडिया, टॉप्स(टार्गेट ऑलिम्पिक पॉडियम) सारख्या महत्त्वाकांक्षी योजनांतून चालना देण्यात येत आहे. २०३६ मधील ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी सरकार प्रयत्नशील असून त्या माध्यमातून भारताला क्रीडा महासत्ता करण्याचे ध्येय आहे,’ असे मत भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे(आयआरएस) यांनी व्यक्त केले.

ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्­नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजित विश्वनाथ स्पोर्ट मिट(व्हीएसएम-२०२४) या वर्षातील सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, पद्मश्री पुरस्कारप्राप्त स्कायडायव्हर शीतल महाजन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. सुनीता कराड, प्र. कुलगुरु डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड, ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे उपस्थित होते. चाटे पुढे बोलताना म्हणाले, सध्या भारतात क्रीडा क्षेत्राचा गोल्डन काळ चालू आहे.

पूर्वी पालक आपल्या पाल्याला अभ्यासाकडे लक्ष दे असे दटावून सांगायचे, मात्र आता त्याला क्रीडा क्षेत्राकडे वळण्यास सांगितले जाते. अशात एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून एवढ्या मोठ्या स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे नक्कीच त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. विद्यापीठातील क्रीडा सुविधाही जागतिक दर्जाच्या असल्याचे कौतुकही चाटे यांनी यावेळी केले.

महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी देखील या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने हजेरी लावताना, एमआयटी एडीटी विद्यापीठ व आयोजकांचे कौतुक केले. या राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील, जे महाराष्ट्रासोबत देशाचेही नाव मोठे करतील असा विश्वास मंत्री बनसोडेंनी यावेळी व्यक्त केला. पद्मश्री शीतल महाजन यावेळी म्हणाल्या, महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांत आपले नैपुण्य दाखविल्यानंतर खेळाडू कुठेतरी मागे पडतात. त्यामुळे हार न मानता विद्यार्थ्यांनी खेळात सातत्य दाखवायला हवे व त्यात चांगले करिअर करण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून व्हायला हवा.

तसेच त्यांनी एअरो स्पोर्टस्(स्कायडायव्हिंग)सारख्या साहसी खेळांकडे देखील वळावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. प्रा. डॉ. मंगेश कराड यावेळी म्हणाले, भारतातील क्रीडा संस्कृतीत वेगाने प्रगती होत आहे. त्यामुळे ऑलिम्पिक-राष्ट्रकुल-आशियाईसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढावे व एकंदर ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंना प्रतिभा दाखविण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न विश्वनाथ स्पोर्ट मिटच्या माध्यमातून होत आहे. त्याच उद्देशाने विद्यापीठात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विश्वशांती प्रार्थना व स्पर्धेचा ध्वज फडकवल्यानंतर मॅनेट कॅडेटतर्फे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन सुरुवात करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा समारोप फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाद्वारे करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा नियोजन समितीचे चेअरमन डॉ. सुराज भोयार यांनी केले तर आभार प्रा. पद्माकर फड यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR