24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात शासकीय व्यवस्था कोलमडली

राज्यात शासकीय व्यवस्था कोलमडली

नाना पटोले यांचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर : महाराष्ट्र पेटवून भाजपला काय प्राप्त होत आहे समजत नाही. सरकार कसे पाप करत आहे. मंत्रीच सांगत आहेत. महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका यांनी घेतली आहे. आज राज्यात शासकीय व्यवस्था कोलमडली आहे. सरकारी कर्मचारी, परिचारिका संपावर आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत.

सर्व समाजाचे शेतकरी आहेत पण सरकारला जनतेचे काहीही पडलेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी उत्तर देणार ते समजत नाही. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. जनतेला वा-यावर सोडले आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. शिवरायांचा महाराष्ट्र पेटवला जात आहे. तो शांत केला पाहिजे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारमध्ये काय चालले आहे? यांनी महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका घेतली आहे. आज सरकारी व्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्र बरबाद करण्याचे काम भाजप सरकारच्या काळात झाले आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसावर चर्चा संपली. मुख्यमंत्री उत्तर देतील असे वाटत होते पण त्यांनी अजून उत्तर दिले नाही. उद्या उत्तर देणार असे कळत आहे. या लोकांनी जनतेला वा-यावर सोडले असे म्हणत पटोलेंनी घणाघात केला.

पोटनिवडणुकीवर पटोले म्हणाले
कोणत्याची लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला तर तिथे पोटनिवडणूक घेतली पाहिजे. पण केंद्र सरकारच्या दबावात येऊन निवडणूक आयोग निर्णय घेत नाही. म्हणून न्यायालयाने यांना फटकारले आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या भूमिकेवर भाष्य केले आहे.

आज मुख्यमंत्र्यांना पुरावे देणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती आहे. जे आरोप केले जात आहेत त्याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. आज मी लेखी स्वरूपात सर्व पुरावे मुख्यमंत्री शिंदे यांना देणार आहे. आयुक्तांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR