24.8 C
Latur
Saturday, August 23, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यपाल राधाकृष्णन वेगळ्या विचारसरणीचे

राज्यपाल राधाकृष्णन वेगळ्या विचारसरणीचे

उपराष्ट्रपतीपद निवडणुकीवर शरद पवारांची स्पष्टोक्ती फडणवीसांचा फोन आल्याचा केला खुलासा

मुंबई : सत्ताधारी पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केला होता. त्यानंतर, आम्ही सगळ्यांनी मिळून दोन ते तीन नावाची चर्चा केली, त्यानुसार सर्वांचे एकमत झाले. जे उमेदवार सत्ताधारी पक्षांने दिले आहेत, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला.

एनडीएचे उमेदवार सी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, म्हणून सहकार्य करावे अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, मी त्यांना ते आमच्या विचारसरणीचे नसल्याचे सांगत शक्य नाही म्हटले, कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत अशी माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपराष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याची माहिती दिली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. त्यासाठी, आमच्या बैठका झाल्या असून आम्ही सुदर्शनजी यांचा फॉर्मही भरला आहे.

भाजपच्या उमेदवारास पाठिंबा देण्याची विनंती मुख्यमंत्र्­यांनी केली होती. मात्र, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी ती विनंती अमान्य केली आहे. याबाबत, आता शरद पवारांनी माहिती दिली. शरद पवारांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांच्या अटकेचा दाखलाही दिला. सोरेन हे राज्यपाल यांना भेटायला गेले असता एजन्सीने त्यांना अटक केली. त्यावेळी, हे राजभवन आहे मला बाहेर अटक करा असे सोरन सांगत होते. असे हे उमेदवार, ज्यांच्या राज्यभवनात मुख्यमंत्र्यांना अटक होते, सत्तेचाही दुरुपयोग आहे असे म्हणत एनडीए आघाडीच्या उमेदवारांवरही शरद पवारांनी टीका केली.

संख्या कमी असली तरी अडचण नाही
सत्ताधारी एनडीए आघाडीची संख्या जरी जास्त असली तरी आम्ही ते बघू, पण मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवर मी कळवले मला शक्य नाही. खासदार संजय राऊतांशी बोलणे झाले, त्यांचीही चर्चा झाली. त्यावेळी, त्यांनीही कळवले की त्यांचा आणि आमचा निर्णय एकच आहे. आम्ही आमचे बघतो, त्यांनी काय करायचे ते ते ठरवतील. निकाल वेगळा लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत व्यक्त केला.

राहुल गांधींच्या बिहार यात्रेचे कौतुक
आम्ही सरकारचा विचार करत नाही. गेल्यावेळी आपण पाहिले ३०० खासदार रस्त्यावर उतरले, आम्हाला अटक केली. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा गौरव सुरू आहे, बिहार आर्थिकदृट्या अडचणीचे राज्य आहे, त्याचे काही प्रश्न असतील. मात्र, राजकिय दृष्टया ते राज्य जागरूक आहे. आणीबाणीच्या काळात पहिला संघर्ष बिहारमध्ये झाला असे म्हणत शरद पवारांनी राहुल गांधींच्या बिहारमधील यात्रेचेही कौतुक केले आहे.

निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही
निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही, निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. मात्र, त्यांनी त्यांची जी भूमिका घ्यायला हवी होती ती घेतली नाही असे म्हणत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाकडून आमची फार काही अपेक्षा नाही, राहुल गांधींनी हे सर्व सत्य समोर आणले, मात्र याची सुरूवात बिहारमधून झाली. राहुल गांधी यांच्या माहितीत एका झोपडपट्टीत एका घरात १४० लोकं राहत आहेत असेही पवारांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR