मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या बहुरंगी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेह-यावर हसू आणणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे गोविंदा. हिंदी, मराठीसह विविध भाषांमधील सिने इंडस्ट्रीत लिलया वावरत गेलेल्या या अभिनेत्याने मनोरंजनसृष्टी गाजवली. आपल्या संवेदनशील अभिनयाच्या जोरावर त्याने लाखो-करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हद कर दी आपने, कुली नंबर-१ तसेच राजा बाबू असे एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे त्याने इंडस्ट्रीला दिले आहेत. दरम्यान, बॉलिवूडच्या या हिरो नंबर-१ बद्दल सिने-पत्रकार, लेखिका अनिता पाध्येंनी माहित नसलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत.
सुरुवातीला गोविंदा खूप चांगला वागायचा. तेव्हा मी विरारला राहायचे त्यामुळे तो मला विरारची मुलगी अशा नावाने हाक मारायचा. तो सुद्धा छान मराठी बोलायचा. जेव्हा त्याची माझी ओळख झाली त्यानंतर तो खूप चांगला वागत होता. जेव्हा मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाले तेव्हा फिल्म इंडस्ट्रीतील ब-याच लोकांची नावं दाऊदसोबत जोडण्यात आली. त्यात गोविंदाचे देखील नाव होते. काहींचे तर फोटो पण समोर आले होते. त्यावेळी इंडस्ट्रीत अंडरवर्ल्डचे सावट होते. त्यातली काही लोकं अगदी चांगलीच होती. जे दिग्दर्शक, निर्माते म्हणून या क्षेत्रात आले होते. त्यानिमित्ताने कधी दाऊदबरोबर किंवा त्याच्या भावाबरोबर ब-याच सेलिब्रिटी लोकांचे फोटो होते.
सेलिब्रिटी असल्याने सगळ्यांनाच फोटो काढायला आवडते. त्याकाळात या लोकांच्या नावाची लिस्ट आली होती आणि त्यांची पोलिसांकडून चौकशी झाली होती. तेव्हा फिल्म इंडस्ट्रीत अंडरवर्ल्ड मोठ्या प्रमाणात प्रभुत्व होते. कोणत्या चित्रपटात कोणत्या कलाकाराला घ्यायचे हे तिथून ठरायचे. त्यामुळे बरेच लोक त्यांची मदत घ्यायचे. पुढे त्या म्हणाल्या त्यावेळी मला गोविंदाची मुलाखत घ्यायला सांगितली होती. तेव्हा वर्सोवाला खूप आतमध्ये एक छोटासा बंगला आहे, तिथे मी त्याची मुलाखत घेण्यासाठी गेले होते. तेव्हा दाऊदचा विषय देखील चर्चेत होता. गोविंदा सेटवर कधीच वेळेत यायचा नाही. नऊची शिफ्ट असेल तर हा तीन वाजता सेटवर यायचा. त्यानंतर सेटवर आल्यानंतर त्याचा कुक वगैरे सगळे सोबत असायचे. तो कुक सेटवर चहा, गरमा-गरम रोट्या वगैरे बनवून त्याला द्यायचा.
आज गोविंदाची जी परिस्थिती आहे त्याला तोच जबाबदार आहे. जेव्हा तो एकेकाळी टॉपचा अभिनेता असताना तो खूप मस्तीमध्ये वागला आहे. याव्यतिरिक्त बडें मियॉं, छोटे मियॉंच्या सेटवर आणि हमच्या सेटवर तेव्हा रजनीकांत आणि अमिताभ बच्चन त्याची वाट बघत बसले होते. असा तो वागायचा. याच मुलाखतीत दाऊदबद्दल बोलला म्हणून गोविंदाने त्यांच्याकडून टेप रेकॉर्डर काढून घेतला होता. असा खुलासा त्यांनी मुलाखतीत त्यांनी केला.