मुंबई : काश्मीर खो-यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात हाय अलर्ट असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस वर गावी जाणा-या प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे, त्या अनुशंगाने सुरक्षा वाढवण्यात आली असून विषेश व्यवस्था करण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी दुपारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे फिरायला गेलेल्या पर्यटकांवर काही दहशतवाद्यांनी गोळीबार करत क्रूर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांनी जाव गमावला तर अनेक जखमी झाले. दहशतावाद्यांच्या या नृशंस कृतीमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असून जगभरातूनही या हल्ल्याचा निषेध होतोय. हल्ल्यानंतर भारताने कडक पावल उचलत कठोर भूमिका घेतली.
भारतात राहणा-या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून पाकिस्तानातील भारतीयांना १ में पर्यंत मायदेशी परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण १३९ रेल्वे स्थानके आहेत, जिथून दररोज सुमारे ३,२०० लोकल गाड्यांची वाहतूक होते. यामुळे दररोज सुमारे ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. याशिवाय, शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्याही चालवल्या जातात, ज्यामध्ये लाखो प्रवासी प्रवास करतात.
सीएसएमटीवर सुरक्षा यंत्रणा तैनात
मुंबईतील दररोज प्रवास करणा-या नागरिकांच्या आणि देश-विदेशातून येणा-या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीसही सतर्क झाले आहेत. मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थानकांमध्ये आणि परिसरात सुमारे १० हजार सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे प्रभावी देखरेख ठेवली जात आहे.
गस्ती वाढविल्या
रेल्वे आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणा-या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रणालीद्वारे सतत निरीक्षण केले जात आहे. सीएसएमटी आणि पुणे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत, आरपीएफ, जीआरपीएफ, डॉग स्क्वॉडकडून गस्तीला सुरूवात झाली आहे.
पुण्यात पाकचे झेंडे चिकटवले
पहलगामच्या हल्ल्यानंतर पुण्यातील लक्ष्मी रोडवर रस्त्यावर पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर चिकटवत निषेध करण्यात आला आहे. या बाबतचा व्हीडीओही व्हायरल झाला आहे. पाकिस्तानच्या झेंड्याचे फोटो रस्त्यावर लावले असून त्यावरून अनेक वाहने जात आहेत, निषेध नोंदवला जात आहे.