बीड : लग्न महिन्याभरावर असताना लग्नाचा बस्ता खरेदी करून बहिणीसोब परत येताना नवरदेवाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये नवरदेवासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने बीडमधील अंबाजोगाई इथं धडक दिली. अपघात इतका भीषण होता की जागीच तिघांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या सेवालाल पंडित राठोड याचे २८ एप्रिलला लग्न होणार होते.
लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बीडच्या अंबाजोगाई शहराजवळ घडला यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. लातूर जिल्ह्यातील बिटरगाव तांडा (ता. रेणापूर) येथील सेवालाल पंडित राठोड (वय २१) या तरुणाचा येत्या २८ एप्रिल रोजी विवाह होणार होता.
सेवालालच्या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल काल बहीण दिपाली सुनील जाधव (वय २०) आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता. लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला होता. ते वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणा-या लातूर – छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसखाली दुचाकी फरफटत जाऊन सेवालाल, बहीण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी नातवाईकांचा आक्रोश पाहून अनेकांची मने हेलावली.