23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रनागपूर विधान भवनावर सोमवारी काँग्रेसचा ‘हल्लाबोल’ मोर्चा

नागपूर विधान भवनावर सोमवारी काँग्रेसचा ‘हल्लाबोल’ मोर्चा

नागपूर (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करीत आहे, तरुणांना नोक-या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही, ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे; पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटिरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी प्रदेश काँग्रेस सोमवारी नागपूर विधान भवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा काढणार आहे. विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मंत्री, आमदार, खासदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेल व विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात सरकारने शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चाही केली नाही. केवळ शेतक-यांना भरपूर दिले आहे अशा पोकळ घोषणा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री देत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार शेतक-यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करून आले; पण अजून कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. या आधीच्या नुकसानीची मदतही अजून शेतक-यांना मिळालेली नाही. पीक विम्याचे पैसेही मिळालेले नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. अपहरण, हत्या, महिला अत्याचारांत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

राज्यात विविध खात्यांतील २.५ लाख पदे रिक्त आहेत; पण सरकार नोकर भरती करीत नाही. लाखो विद्यार्थी नोकरीची प्रतीक्षा करीत आहेत; पण सरकार परीक्षाही घेत नाही. सरकारच्या वेळकाढूपणामुळे लाखो मुलांची वयोमर्यादा निघून जात आहे. शेतक-यांना तातडीने मदत द्यावी, नोकर भरती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, धानाला एक हजार बोनस द्यावा, हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरू करावीत, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, कायदा सुव्यवस्था सुधारावी, अशा विविध मागण्या घेऊन काँग्रेसचे हल्लाबोल मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR