नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यांच्या घटनांनंतर राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी अशा देशात राहण्याची लाज वाटते असे वक्तव्य केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोनारपूर येथे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर काही लोकांनी दगड आणि अंडी फेकली, तसेच त्यांना शिवीगाळही केली होती. या घटनेच्या दुस-याच दिवशी हुगळी जिल्ह्यात पक्षाचे दुसरे खासदार कल्याण बॅनर्जी यांना एका पोलिस ठाण्यासमोर कथितपणे धक्काबुक्की करण्यात आली होती.
कपिल सिब्बल काय म्हणाले?
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवरील या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना सिब्बल म्हणाले हे अत्यंत लाजीरवाणे आहे. मला अशा देशात राहण्याची लाज वाटते जिथे अशा घटना घडतात, जिथे सत्तेत असलेला राजकीय पक्ष आपल्या महान नेत्यांनी प्रजासत्ताक स्थापनेच्या वेळी रचलेला लोकशाहीचा पाया नष्ट करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.
भाजपचा सिब्बल यांच्यावर पलटवार
सत्ताधारी पक्षावर टीका केल्याबद्दल भाजपने सोमवारी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजपने त्यांच्यावर भारतद्वेषी असल्याचा आरोप केला आणि २०२१ मधील पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसेवर ते गप्प का राहिले, असा सवाल केला. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करून सिब्बल यांनी कोट्यवधी रुपये कमावले आणि तरीही त्यांना भारतात राहण्याची लाज वाटते.
















