विटा (जि. सांगली) : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असताना आता हा वाद मिटविण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र केसरीचा विजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ व उपविजेता मल्ल शिवराज राक्षे या दोघांनी पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पै. चंद्रहार पाटील यांनी ही स्पर्धा लवकरच सांगली येथे घेणार असून या दोघांत पुन्हा कुस्ती लावून महाराष्ट्र केसरीचा सुरू असलेला वाद सांगलीत मिटविणार असल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र केसरीची स्पर्धा नुकतीच पार पडली. परंतु, ही स्पर्धा पंचाने चुकीचा निर्णय देत पै. मोहोळ याला विजयी घोषीत केल्याचा आरोप अनेकांनी केला. त्यावेळी संतप्त झालेल्या पै. राक्षे याने पंचाला लाथ मारली. या प्रकारानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी राक्षेच्या कृतीचे समर्थन करीत पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असे विधान करीत महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा मी परत करणार असल्याचे पै. पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडालीच शिवाय सोशल मीडियावर महाराष्ट्र केसरी मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने पै. शिवराज राक्षे याच्यासोबत पुन्हा एकदा कुस्तीची लढत द्यावी, अशी मागणी होऊ लागली. या सर्व प्रकारानंतर पै. मोहोळ व पै. राक्षे या दोघांनीही महाराष्ट्र केसरीसाठी पुन्हा लढण्यास तयार असल्याचे सांगितले.
त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या दोन्ही मल्लांची सांगलीत कुस्ती लावण्याची तयारी केली आहे. या दोघांना पै. पाटील यांनी प्रत्येकी २५ लाख रूपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला असून त्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र केसरीच्या सुरू असलेल्या वादावर सांगली येथे पडदा पडणार आहे.
महाराष्ट्र केसरीचा वाद सांगलीत संपणार
सांगलीला कुस्तीची परंपरा आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरीसाठी पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे या दोघांची कुस्ती पुन्हा सांगलीत लावणार आहे. निर्विवाद कुस्ती कशी असते हे मी महाराष्ट्राला दाखवून देणार आहे. या कुस्तीसाठी मी स्वत: वैयक्तिक मोहोळ व राक्षे याला प्रत्येकी २५ लाख रूपये देणार आहे. या दोघांत निर्विवाद कुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्राचा वाद सांगलीत मिटणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी दिली.