सोलापूर : मागील वर्षी अत्यल्प पावसाने कोरडे राहिलेल्या तलावात यंदा जून महिन्यातच पाणी येऊ लागले आहेत. मध्यम व लघू अशा २१ तलावात पाणीसाठा झाला आहे. मध्यम तलावात दीड टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात जून महिन्यात यंदा चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या व ओढे भरून वाहिले आहेत. जून महिन्यात भीमा, सीना, नागझरी व इतर नद्यांना पाणी आल्याने लवकर उन्हाळा कमी झाला आहे. मागील वर्षी जून महिन्यात अल्पसा पाऊस पडला होता. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता मात्र जून व ऑगस्ट महिन्यात फारच कमी पाऊस पडल्याने पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखी परिस्थिती जाणवत होती.
पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील मध्यम व लघू तलाव कोरडे राहिले होते. पूर्ण पावसाळ्यात चार-सहा तलाव सोडले तर इतर मध्यम व लघू तलाव कोरडेच राहिले होते. भरोश्याचा पाऊस म्हणून परतीचा पाऊस दरवर्षी जिल्ह्यात दरवर्षी पडतो. मागील वर्षी परतीच्या पावसानेही दगा दिला होता. यावर्षी जून महिन्यात जिल्ह्याच्या वर्षाच्या सरासरीच्या ४० टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आहे. दमदार पाऊस पडलेल्या तालुक्यातील तलावात पाणीसाठा झाला आहे.जिल्हातील एकरुख (तळेहिप्परगा) तलावात ०.५७ टीएमसी तर मांगी, जवळगाव, आष्टी, बोरी, हिंगणी, पिंपळगावढाळे या मध्यम तलाव झालेल्या साठ्यासह दीड टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
केवळ जून महिन्यात साडेसात टक्के पाणीसाठा झाला आहे.जिल्हातील ५५ मध्यम तलावांपैकी १६ तलावात कमी-अधिक प्रमाणात पाणी आले आहे. होटगी तलाव ५० टक्के भरला असून कारी ५२ टक्के, वैराग ४४ टक्के, गोरमाळे २९ टक्के, कळंबवाडी २६ टक्के, शेळगाव २३ टक्के, म्हसेवाडी ३७ टक्के, घेरडी ३२ टक्के, जवळा २५ टक्के, कासेगाव व ममदापूर प्रत्येकी १९ टक्के, पडवळकरवाडी २० टक्के, चिंचोली ९ टक्के, राजुरी १३ टक्के, वालवड १४ टक्के व कोरेगाव १७ टक्के, असे ७.८७ टक्क्यांपर्यंत पाणी साठले आहे.