नवी दिल्ली : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरू आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे असा खळबळजनक विधान नीलम गो-हे यांनी केले आहे. नीलम गो-हे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम त्यांना (शिंदेंना) दिले होते. (उबाठाच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा सनसनाटी आरोप नीलम गो-हे यांनी केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असेही विधान नीलम गो-हे यांनी केले. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी नीलम गो-हे यांची मुलाखत घेतली.
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा आरोप नीलम गो-हे यांनी केला. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही नीलम गो-हेंची नमकहरामी आहे, असे प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिले. मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने वेगवेगळ्या कामांसाठी निधी दिला. माझ्याकडे पक्षाने कधीही पैसे मागितले नाहीत, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.
गो-हे ‘मातोश्री’वर कायम पडीक असायच्या; सुषमा अंधारे
नीलम गो-हे आमच्या पक्षात खूप काळ राहिल्या आहेत. ३० वर्षे त्यांनी आमच्या पक्षात काम केले. नीलम गो-हे यांनी जे आरोप केले आहेत, त्यात काही तथ्य असेल, तर सर्वांत जास्त कमाई नीलम गो-हे यांनीच केली असावी. नीलम गो-हे ‘मातोश्री’वर कायम पडीक असायच्या, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.