नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे दोन दिवसीय नेपाळच्या दौ-यावर आहेत. या दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अनेक करारांवर स्वाक्ष-या केल्या आहेत. या करारानुसार नेपाळमधून भारताला पुढील १० वर्षांत १०,००० मेगावॅट वीज निर्यात करण्यात येणार आहे. जयशंकर आणि नेपाळचे ऊर्जा, जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्री शक्ती बहादूर बस्रेत यांच्या उपस्थितीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत वीज निर्यात करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी नेपाळचे ऊर्जा सचिव गोपाल सिग्देल आणि त्यांचे भारतीय समकक्ष पंकज अग्रवाल यांनी द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली.
पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान वीज निर्यात करण्याबाबत करार झाली होती. पुष्प कमल दहल हे गेल्या वर्षी ३१ मे ते ३ जून या कालावधीत भारत दौ-यावर आले होते. त्यावेळी, दोन्ही बाजूंनी शेजारील देशातून नवी दिल्लीची वीज आयात सध्याच्या ४५० मेगावॅटवरून पुढील १० वर्षांत १०,००० मेगावॅटपर्यंत वाढवण्याच्या करारासह अनेक प्रमुख करारांवर स्वाक्ष-या केल्या होत्या. सकाळी जयशंकर यांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान दहल यांची आपापल्या कार्यालयात भेट घेतली. जयशंकर नेपाळ काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा आणि सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांच्यासह प्रमुख राजकीय नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे.
भारतात विजेचा वापर किती?
देशभरात विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारतातील वार्षिक विजेची मागणी १३०० अब्ज किलोवॅट तास ओलांडली आहे. हा आकडा आर्थिक वर्ष २०१२ च्या तुलनेत सुमारे ७० टक्के अधिक आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक विजेची मागणी असलेले राज्य आहे. त्यानंतर गुजरातचा क्रमांक लागतो. यानंतर यूपी, तामिळनाडू आणि ओडिशा देशातील विजेच्या मागणीत पहिल्या पाच राज्यांमध्ये येतात.
वीज मागणी वाढणार
२०२२ मध्ये, भारताची वार्षिक वीज मागणी २०१२ च्या तुलनेत ५३० अब्ज युनिट्सने वाढण्याचा अंदाज होता. ओडिशामध्ये वार्षिक विजेच्या मागणीत ५० बीयूची वाढ झाली आहे. येथे, विजेची मागणी ३२ बीयूवरून ८२ बीयूपर्यंत वाढली आहे. विजेच्या मागणीत सर्वात जलद वाढ बिहारमध्ये दिसून आली आहे. तिथे विजेची मागणी २०१२ मध्ये ६ बीयू वरून २७ बीयूपर्यंत वाढली आहे. १० वर्षांत त्यात ३५० टक्क्यांची वाढ झाली.