बार्बाडोस : विराट कोहलीने राखून ठेवलेली महत्त्वपूर्ण ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळली. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारताच्या आघाडीच्या फळीने चुकीचे फटके खेचून विकेट फेकल्या. पण, विराट व अक्षर पटेल चतुराईने खेळले आणि दोघांच्या ७२ धावांच्या भागीदारीने सामन्याचे चित्र बदलले. अक्षर दुर्दैविरित्या रन आऊट झाल्यानंतर विराटने गिअर बदलला आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.
रोहित शर्मा ( ९) , रिषभ पंत ( ०) व सूर्यकुमार यादव ( ३) हे ३४ धावांत माघारी परतले. विराट व अक्षर पटेल यांनी भारताचा डाव सावरला आणि चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. कोहलीने ४,४,२,४ असे फटके खेचून इरादा स्पष्ट केला. दुस-या षटकात केशव महाराजने भारताला दोन धक्के दिले. कागिसो रबाडाने सुर्याला बाद करून भारताला ३४ धावांत तिसरा धक्का दिला. अक्षर पटेलने मिळालेल्या बढतीचा फायदा उचलताना ४ खणखणीत षटकार खेचले. विराट अन् अक्षरची ५४ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी दुर्दैवीरित्या संपुष्टात आली.किं्वटन डी कॉकच्या थ्रोवर अक्षर ( ४७ धावा, ३१ चेंडू, १ चौकार व ४ षटकार) रन आऊट झाला.
शिवम दुबे आक्रमक फटकेबाजीच्या इराद्यानेच आला होता, पण कोहली सेट होऊनही सावध पविर्त्यात दिसला. त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ४८ चेंडू घेतले. मात्र, त्यानंतर त्याने गिअर बदलला आणि रबाडाला मारलेला षटकार लाजवाब होता. विराट व शिवम यांनी ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करून आफ्रिकेवर दडपण निर्माण केले. विराट ५९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७६ धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्याला पहिल्याच चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मिळाला. शिवम ( २७) २०व्या षटकात झेलबाद झाला. भारताने ७ बाद १७६ धावा केल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.