मुंबई : हिंदू मुस्लिम भाई भाई असे म्हटले जाते; मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर गोळ्या घातल्या गेल्या? असा सवाल करत सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून हिंदूंनी आधी बाहेर पडायला हवे, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी भयंकर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांसह २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया देत सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनी बघायचा मग बाकीच्यांनी का बघायचा नाही? असा सवाल केला आहे. खानापूर शहरातील महादेव मंदिरातील विटंबना झालेल्या नंदीच्या मूर्तीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाकडून आज महादेव मंदिरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
पूर्वीच्या लोकांनी षडयंत्र केले. हिंदी-चिनी भाई भाई, हिंदू-मुस्लिम भाई भाई. मग भाई भाई असताना काश्मीरमध्ये हा प्रकार का घडला? हिंदू मुस्लिम भाई भाई आहेत तर तुम्ही धर्म विचारून का आमच्या भावांना गोळ्या घातल्या? काही लोकांनी कलमा पढल्यानंतर सुद्धा त्यांचे कपडे उतरवून बघितले. त्यानंतर गोळ्या घालण्यात आल्या हा काय प्रकार आहे? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावे. हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही, असेही ते म्हणाले. सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनी बघायचा मग बाकीच्यांनी का बघायचा नाही? काश्मीरमधल्या पंडितांना कोणी घालवले? तिथे काय पाकिस्तानचे मुसलमान आले होते का? त्यांच्या गल्लीत राहणा-या लोकांनीच त्यांना घालवले. तिथे कोणी पाकिस्तानी माणूस आला नव्हता, असे पडळकर यांनी म्हटले.