मुंबई : एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या १३ पैकी ७ खासदारांची तिकिटे कापली गेली. हा नियतीचा खेळ आहे. त्यांना पश्चाताप होत असेल. आता त्यांना उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’ची आठवण येत असेल, असे म्हणत उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
वरुण सरदेसाई म्हणाले, २०१४, २०१९ साली या सगळ्या उमेदवारांना ‘मातोश्री’वर बोलावले गेले होते. स्वत: ठाकरे कुटुंब उपस्थित असायचे. रश्मी ठाकरे औक्षण करून यांना एबी फॉर्म द्यायच्या. आता दहा-दहा तास वेटिंग करावे लागते. तरी देखील तिकिट मिळत नाही.
शिंदे गटावर टीका करताना वरुण सरदेसाई पुढे म्हणाले, ‘मातोश्री’वर मिळणारा मान आणि आत्ताचे त्यांचे स्थान हे चित्र डोळ्यांसमोर येऊन सगळ्यांना जाणीव झाली असेल. शिवसेना आम्ही पुढे घेऊन जाणार, असे म्हणणा-यांना डबल देखील जागा मिळवता येत नाहीत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांनी २१ उमेदवारांची घोषणा केली आहे.
वरुण सरदेसाई पुढे म्हणाले, सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतर देखील तिकिट कापले जात आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेच्या विद्यमान खासदारांना देखील कल्पना असेल की माझ्यासोबत असे होईल.
यामुळेच कदाचित त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जात नाही. कल्याण लोकसभेत भाजप आणि शिवसेनेने सर्व्हे केला.
हा केलेला सर्व्हे निगेटिव्ह असल्याने श्रीकांत शिंदे यांच्या नावाची शिवसेनेकडून अधिकृत घोषणा होत नाही.