सोलापूर – येथील ड्रीम व सावली फाउंडेशन आणि विविध संस्थेच्या व शाळा व महाविद्यालय यांच्या सहकार्यान जागतिक जल, वन व हवामान दिनानिमित्त आयोजित अकराव्या राष्ट्रीय जल साक्षरता संमेलनांतर्गत सकाळी ८ वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव ते वसुंधरा महाविद्यालय जुळे सोलापूर दरम्यान भव्य जल दिंडी काढण्यात आली.
या दिंडीचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते जल पूजन करून झाले. याप्रसंगी एम. के. फाउंडेशनचे नागेंद्र कोगनुरे, सावली फाउंडेशनचे दत्ता पाटील, माजी सैनिक संघटनेचे अरुण तळीखेडे, वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शाहीर रमेश खाडे यांनी स्वागत तर संयोजक काशीनाथ भतगुणकी यांनी प्रास्ताविक केले. या जलजागृती दिंडीत संगमेश्वर महाविद्यालय, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, वसुंधरा महाविद्यालय आणि युवराज हॉस्पिटल स्टाफ, गणेश नाईक प्रशाला, स्वामी विवेकानंद प्रशाला, रेवणसिद्धेश्वर कन्नड प्रशाला, ड्रीम आयएएस सेंटरमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व सांगून आगामी काळात पाण्याचे खूप मोठे संकट निर्माण होणार असल्याने लोकांनी पाणी बचत करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांना जल जागर दूत व्हावे लागेल आणि पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम यशस्वी करावी लागेल, असेही ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी जल है तो कल है, पाणी सांभाळा जीवन सांभाळा, जल साक्षरता काळाची गरज, जल, जंगल,जमीन, जनावर वाचवा असे आवाहन केले. या दिंडीत बालाजी अमाईन्स, वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह विविध सामाजिक संस्था व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. लोकांना पाणी बचतीचे महत्त्व, शुद्ध पाणी व स्वच्छ हवा आणि निरोगी जीवन यावर प्रबोधन करण्यात आले.
दरम्यान, कुलगुरू डॉ. महानवर यांच्या हस्ते डॉ. राहुल मेडीदार, डॉ. तेजस काळे, डॉ. संतोष राठोड, दत्ता शिंगे, डॉ. प्रकाश घटोळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ही जल दिंडी यशस्वी करण्यासाठी प्रा. घंटेवाड, प्रा. मोगली, प्रा. कोळी, संगीता भतगुणकी, डॉ. वासंती पांढरे यांनी परिश्रम घेतले. तर आभार प्रा. अंबादास पांढरे यांनी मानले.