जालना/ मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतची वेळ दिली होती. परंतु ही वेळ शनिवारी संपत आली असून सरकारने शब्द न पाळल्याने जरांगे पुढे काय भूमिका घेतात, हे पाहाणे महत्त्वाचे आहे.
सगेसोय-याची अंमलबजावणीसह हैदराबाद गॅझेट, नागपूर गॅझेट, मुंबई गॅझेट लागू करण्याची मनोज जरांगे यांची मागणी आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात मंत्री शंभुराज देसाई यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. शंभूराज देसाई म्हणाले की, जरांगे यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा त्यांच्याकडे दोन महिन्यांची वेळ आम्ही मागितली होती, परंतु एकच महिन्यांचा कालावधी त्यांनी दिला. एक महिन्यात त्यांना आम्ही भेटून आल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही. दोन-तीन गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या मांडल्या होत्या त्यामध्ये सगे सोय-यांची अंमलबजावणी आणि हैदराबाद गॅझेट.. या दोन्ही बाबतीत सर्वपक्षीय बैठक मागच्या चार दिवसात मुख्यमंत्र्यांनी घेतली,
दुर्दैवाने महाविकास आघाडीने त्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांचे त्याबाबतीत काय म्हणणे आहे हे आम्हाला कळू शकले नाही, बहिष्कार टाकला म्हणून आम्ही काय हातावर हात मारून बसलेलो नाही. शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, रोजच्या रोज आम्ही आढावा घेत आहोत बैठका घेत आहोत, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आग्रह जो जरांगे यांचा आहे यासाठी आमच्या ११ अधिका-यांची टीम मागील चार दिवसांपासून तेलंगणा गव्हर्मेंटकडे गेलेली होती. काल ती टीम परत आलेली आहे, मात्र त्यांच्याशी अद्याप माझी चर्चा झालेली नाही. सोमवारी त्यांच्याशी माझी चर्चा होणार आहे त्याबाबतीत पण आम्ही सकारात्मक आहोत. शिंदेंनी जो शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू.
हरकतींची छाननी सुरू
सगे सोयरे संदर्भात ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढलेला आहे, आठ लाखांपेक्षा जास्त ऑब्जेक्शन हरकती आलेल्या आहेत, त्यानंतरसुद्धा कालच्या बैठकीत याबाबतीत लीगल ओपेनियेन कायदेशीर पद्धतीने लोकांनी दिलेले आहेत त्या सगळ्या बाबतीतली छाननी आमच्या विभागामार्फत सुरू आहे.
जरांगेंना मुख्यमंत्र्यांवर विश्वास
मनोज जरांगेंच्या अल्टिमेटमबद्दल बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, मनोज जरांगेंनी थोडासा संयम बाळगला पाहिजे. माझी त्यांना विनंती आहे, ते सातत्याने म्हणत आहेत की माननीय मुख्यमंत्र्यांवर त्यांना विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांनी मला नेहमीचे आदेश दिलेले आहेत की एकही दिवस वाया न घालवता याबाबतीतलं काम चालू ठेवा. दोन-तीन आठवडे अधिवेशनात गेले, सोमवारपासून रोजच्या रोज आमचा याबाबतीत काम करण्याचा प्रयत्न आहे, असा विश्वास देसाईंनी बोलून दाखवला.