36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रखिचडी चोर अमोल कीर्तिकर यांचा प्रचार करणार नाही

खिचडी चोर अमोल कीर्तिकर यांचा प्रचार करणार नाही

काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी शड्डू ठोकला

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने महाविकास आघाडीत वादाला सुरवात झाली आहे. अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस नेते संजय निरुपम प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेतृत्व शिवसेनेला सरेंडर झाले असून, आता माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असतील. आठवडाभरात मी मोठी घोषणा करू शकतो, आता आरपारची वेळ आली असल्याचे निरुपम म्हणाले आहेत.

शिवसेनेने आपले मुंबईतील उमेदवार घोषित केले आहेत. ज्यात सहा पैकी पाच ठिकाणी शिवसेना लढणार हे निश्चित झाले आहे. काँग्रेस पक्षाला खड्ड्यात घालण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस पक्षातून निगोसिएशन करणा-या शिवसेनेचा निषेध करतो. शिवसेनेने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी खिचडी सप्लायरकडून दलाली घेतली आहे. अशा उमेदवाराला आमच्यावर थोपवले आहे. मी खिचडी चोरचे काम करणार नाही, यासंदर्भात मी आत्ताच घोषणा करतोय, असे निरुपम म्हणाले.

संजय निरुपम काय म्हणाले?
माझ्या वरिष्ठ नेत्यांना आग्रह करतो की, शिवसेनेला यासंदर्भात जाब विचाराला हवा. आमच्या नेतृत्वाला काही चिंता वाटत नाही. मला मागील १० दिवसांत कोणीही संपर्क केला नाही आणि विचारले नाही. आपण काय करू शकतो. काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतच न्याय होत नाही. न्यायाच्या गप्पा मारणारे आपल्याच कार्यकर्त्यांवर अन्याय करतायत. माझा हक्क बनतो इथून लढण्याचा आणि आमचे नेतृत्व शिवसेनेला सरेंडर झाले. मी माझ्या नेतृत्वाला सांगू इच्छितो, माझ्याकडील सर्व पर्याय खुले असतील. एका आठवड्याहून अधिक वेळ मी नाही देऊ शकत. टफ निगोशिएटर आमचे नेतृत्व नव्हते हे स्पष्ट दिसते आहे. आमच्या नेतृत्वाचे हे अपयश आहे हे मी मान्य करतो. काँग्रेसला वाचवण्यात मुंबईतून आम्ही अपयशी झालोय हे दिसतं. सांगलीची जागा त्यांनी घोषणा केली यावरून स्पष्ट दिसतंय की काँग्रेसची त्यांना गरज नाही, असे निरुपम म्हणाले.

काँग्रेस संपवण्याचा शिवसेनेचा अजेंडा
शिवसेना एकट्याच्या दमावर लढू शकत नाही हे स्पष्ट दिसतंय. शिवसेनेने काँग्रेसच्या सीट ओढून घेतल्या आहेत. त्यांचा एक अजेंडा असेल ज्यात काँग्रेस संपवण्याचा त्यांचा विचार असेल. प्रकाश आंबेडकर वरिष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांनी मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली. मात्र चर्चेवेळी देखील दिसतंय की त्यांना वा-यावर सोडून दिलं. एका आठवड्यानंतर काय होणार हे तुम्हाला कळणारच आहे. मुंबईत एकवेळी पाच खासदार काँग्रेसचे असायचे. पण आता काँग्रेसचा मतदार कुठे जाणार? शिवसेनेकडे जाणार? मला संभ्रम आहे त्याबाबत. मी आवाहन करतोय तेव्हा माझे कार्यकर्ते देखील अमोल कीर्तिकरचा प्रचार करणार नाहीत, असे निरुपम म्हणाले.

पार्टीला वाचवायचे असेल तर युती तोडा
मायग्रेट लेबर हा काँग्रेसचा मतदार आहे. त्यांच्या आयुष्यासोबत जो व्यक्ती खेळला आहे त्यांना मतदारदेखील मतदान करणार नाही. शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीला मी आधीच विरोध केला होता. आता पाच वर्षांनंतर तेच दिसतंय. मात्र, आमचे काही नेते होते त्यांना सत्तेची मलई खायची होती आणि हे घडलं. पार्टीला वाचवायचं असेल तर युती तोडा आणि मैदानात जाऊयात असेही निरुपम म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR