मुंबई – प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीवरून आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या यादीवर नाराजी व्यक्त केली आहे.चर्चा सुरू असलेल्या जागांची यादी जाहीर करायला नको होती असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
उद्धवजींनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांबाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे, असे माझे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.