22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीसोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास होणार कायदेशीर कारवाई

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास होणार कायदेशीर कारवाई

परभणी /प्रतिनिधी
जिल्ह्यात सर्व धर्माचे नागरिक हे एक-दुस-यांचे सण उत्साहात आणि शांततेत साजरे करत आले आहेत. परंतू काही दिवसापासून हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या सुरु असलेल्या उरुस यात्रेत काही दिवसांपासून अनुचित प्रकार घडत असून काही तरुण वर्ग सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजात चूकीचे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करुन वातावरण बिघडवत असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्व समाजातील नागरिकांनी आप-आपल्या समाजातील तरुण युवकांना सोशल मिडियाच्या माध्यमातून चूकीच्या आक्षेपार्ह संदेश प्रसारित करु नये याबाबत समजावून सांगावे अशा सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उरुस यात्रेनिमित्त शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बोलत होते. यावेळी खा. संजय जाधव, खा. फोजिया खान, पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी गावडे म्हणाले की, हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उरुस यात्रेला ११७ वर्षाची परंपरा आहे. परंतू मागील काही दिवसा पासून सोशल मिडियावर ज्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित होत आहेत त्यामुळे वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. याकरीता सर्व समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी आपल्या समाजातील तरुणांना अशा पोस्ट करु नये याबाबत सांगावे. अन्यथा अशा अप्रिय घटनेचा विचार करुन कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाला योग्य निर्णय घ्यावा लागेल. सर्व नागरिकांनी शांतता कायम राखुन पोलीस विभागास सहकार्य करावे. नागरिकांनी विशेषत: युवकांनी सदविवेकबुद्धीचा वापर करून सोशल मिडियाचा काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गावडे यांनी केले.

पोलीस अधिक्षक परदेशी म्हणाले की, उरुस यात्रा ही शांततेत सुरु आहे. परंतू काही तरुणांनी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याने वातावरण खराब होण्याची शक्यता होती. परंतू पोलीस विभागाने सर्व प्रकरणांवर लक्ष ठेवलेले असून सर्व प्रकरणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे तरुण विद्यार्थी आहेत. त्यामुळे कोणाचेही भवितव्य खराब करण्याची इच्छा नाही. त्यामुळे नागरिक आणि तरुणांनी याबाबत सजग राहावे. पोलीस विभागाचा सायबर सेल सक्षम असून त्याद्वारे सर्व घटनांवर पोलीस लक्ष ठेवून आहे. मुलांनी चूकीच्या पोस्ट सोशल मिडियावर टाकू नये याकरीता समजावून सांगावे. अन्यथा दोषींवर कार्यवाही करण्यात येत आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे सांगितले.
सर्व धर्माच्या लोकांनी यात्रेत चूकीचे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करावे असे खा.संजय जाधव यांनी यावेळी सांगितले. खा. श्रीमती फौजिया खान यांनी सोशल मिडियावर चूकीचा संदेश प्रसारित करु नये. सायबर क्राईम अंतर्गत दोषींवर कार्यवाही करावी असे सांगितले. यावेळी सर्व समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती होती.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR