मुंबई : प्रतिनिधी
थेट परदेशी गुंतवणूकीत यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत कर्नाटकात प्रथम क्रमांकावर असून महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर गेला आहे. फडणवीस सरकारच्या अगोदरच्या कालावधीतही कर्नाटक असाच एकदा पुढे गेला होता. यशाचे श्रेय घेताना फडणवीस पुढे यÞेतात तसेच अपश्रेय ही पुढे येऊन घ्यावे अशा शब्दात काँग्रेस समितीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. दाओसमध्ये जाऊन कोट्यवधी रुपयांचे करार केले. त्यामुळे रोजगार आणि थेट परदेशी गुंतवणूक वाढत असल्याचा दावा महायुती सरकार सतत करीत आहे. पण सचिन सावंत यांनी आकडेवारी सादर करून या क्षेत्रात महाराष्ट्राची कशा प्रकारे पिछेहाट होत आहे याचे पुरावेच दिले. त्यामुळे महायुती सरकारच्या दाव्याची पोलखोल झाली आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना केंद्र सरकारने एका वर्षाचा कम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर श्रेणीतील परदेशी गुंतवणूक जाणिवपूर्वक गुजरातला पाठवली तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र मागे गेला अशी टिका देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार असताना महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आला आहे. सगळयात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे या तिमाहीतील सर्वाधिक गुंतवणूक देशात कम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात आली आहे. यातील बहुतेक गुंतवणूक ही कर्नाटकला गेलेली दिसत आहे.
हिंजवडीतील आयटी पार्कचे वाटोळे झाले
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील रस्त्यांची पाहणी केली. हिंजवडीच्या आयटी पार्कच्या परिसरातील रस्त्यांची दुर्दशा पाहून अजित पवार संतापले होते. हिंजवडी आयटी पार्क परिसरात जाऊन महाराष्ट्राचे वाटोळे झाले, आपले आयटी पार्क बंगळुरूला चालले आहे असे अजित पवार यांनी म्हटले होत ते आता खरे होत आहे याकडे सचिन सावंत यांनी लक्ष वेधले.