पुणे : महायुती सरकारमध्ये कृषिमंत्री सारखे महत्त्वाचे खाते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र, विद्यमान कृषिमंत्री कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत देण्याचे काम त्यांच्याकडून होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांनी कोकाटे यांना चांगलेच खडसावले होते. मात्र, तरी देखील कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतक-यांच्या प्रश्नावरुन त्यांनाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले की, कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात आणि कांद्याचे भाव पडतात हा तर्क आहे महाराष्ट्र राज्याचे महान कृषिमंत्री कोकाटे साहेबांचा! कांद्याचे दर थोडेफार उत्पादन वाढल्याने पडत नाहीत तर केंद्र सरकारच्या निर्यात बंदी, निर्यात शुल्क यासारख्या धोरणांमुळे आणि झोपलेल्या राज्य सरकारमुळे पडतात. त्यामुळे राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आपले ब्रम्ह ज्ञान शेतक-यांना देण्याऐवजी केंद्र सरकारला दिले तर अधिक बरे होईल.
कृषिमंत्री पद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे, परंतु विद्यमान कृषि मंत्र्यांना मात्र त्यांची जबाबदारी अजूनही समजलेली दिसत नाही, त्यामुळे नेतृत्वाने कृषिमंत्र्यांची राजकीय काळजी करण्यापेक्षा शेतक-यांची काळजी करावी. अजित पवारांनी धाडसी निर्णय घेऊन ज्याला शेतीची समज आहे, संवेदना आहे अशा जबाबदार व्यक्तीकडे कृषिमंत्री पद सोपवायला हवे.
कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्ये
– कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही. मला एक सांगा, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचे तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का?
– सरकार भांडवली गुंतवणूक करते. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करतात.