22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव

मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव

उपोषणाचा पाचवा दिवस मात्र उपचार घेण्यास नकार

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि अधिसूचनेचे रुपांतर कायद्यात झाले पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिस-यांदा उपोषण सुरू केले आहे. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो आहे अशी माहिती समोर आली आहे. कुठल्याही प्रकारचे उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. सगेसोय-यांसाठीच्या कायद्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.

सगेसोयरे यांच्याविषयीचा जो अध्यादेश राज्य सरकारने आणला आहे त्याचे रुपांतर कायद्यात करा अशी प्रमुख मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास सातत्याने नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मंगळवारी जिल्हा आरोग्यपथक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. मात्र रक्तदाब तपासण्यासही मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. आमच्याकडून दर तासाला त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते आहे. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यांनी किमान पाणी घेतले पाहिजे मात्र त्यासाठीही त्यांनी नकार दिला आहे असे वरिष्ठ डॉक्टरांनी मंगळवारी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होतो आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी रात्री जालना-जळगाव मार्गावर टायर जाळण्यात आले. तर हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला. लातूर, उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. तर मालेगावमध्येही ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR