छ. संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भातील प्रकरणावर एसआयटी चौकशीची घोषणा विधिमंडळात झाली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांवर आपण ठाम असल्याचे त्यांनी म्हटले. एसआयटी चौकशीवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, चांगले आहे. मंत्र्यांची सुद्धा चौकशी होऊ द्या. मला कोणतीही भीती नाही. पण अर्धवट चौकशी करू नका. मी परवाच यासंदर्भात बांधवांना संकेत दिले होते. मला गुंतवण्याचा प्रयत्न होतोय, हे सांगितले होते.
देवेंद्र फडणवीस सत्तेचा वापर करणार आहेत. माझा कुठेच दोष नाही. मी कुठे जाण्यास तयार आहे. कुठेही कोणतीही चौकशी करा, मी तयार आहे. मला पाठिंब्यासाठी कोणाचा फोन नाही. कोणाचे पैसे नाहीत. मला सर्वांत जास्त फोन तुमचे आले आहेत. मी तुमचेही प्रकरण काढतो. आता सर्व चौकशी करावी लागेल. त्यातून सुटका नाही. ६०० अधिकारी जातील.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे मीच त्यांच्या घरी जाणार होतो. आता संपूर्ण समाज त्यांच्या पूर्ण विरोधात गेला आहे. आम्ही आधी ५० वर्षे तुम्हालाच मोठे करण्यात घालवली ना. मी निर्भीड आहे. म्हणून माझ्यावर डाव टाकत आहेत. तुम्हाला जे करायचे आहे, ते करा. मी ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही.
दगडफेक तुम्हीच करायला लावली
दगडफेक हे त्यांचे कामच आहे. जे आरोप करत आहेत त्यांनीच दगडफेक करण्यासाठी पाठवले आहे. गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हीडीओ काढत होते. ती शूटिंग पण आणा, हे पण मी सांगतो. त्या ठिकाणी हजार जण आले आणि हाणायला सुरू केली. मला अटक केली तरी मी तयार आहे. मी फाशीवर जायला भीत नाही. जातीसाठी मरण येईल. फडणवीस यांच्यामुळे मला पवित्र मरण येईल.