मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा आंदोलकांना मोठे यश मिळाले आहे. राज्यातील युती सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यात ‘सगे-सोयरे’मुद्याचाही समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात अध्यादेशही काढण्यात आला आहे. मात्र यानंतर आता, ते नोटिफिकेशन नोटीस आहे, असे म्हणून एकूण सर्व बाबींना सोबत घेऊन, मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत काय काय सुरू आहे, या सर्व गोष्टींसाठी लवकच न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल, असे गुुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.
सदावर्ते म्हणाले, ‘खुल्या वर्गातील जे जे कुणी असतील, त्यांच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे, त्या जागांवर गदा न येऊ देणे, ही जबाबदारी माझ्यावर आहे. याचबरोबर जे खरे मागास आहेत, म्हणजेच, जे लोहार भाऊ असेल, सुतार भाऊ असेल, न्हावी भाऊ असेल, अशा कष्टाच्या आधारेही मागास आहेत, सामाजिक मागास आहेत, त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठीचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे जे संविधान आहे. जे प्रभू श्री रामचंद्रांच्या समानतेच्या आधारावर, नीतीच्या आधारावर, हिंदुस्थानला न्याय देण्यासाठीचे आहे. त्याच्यासाठीची आमची पैरवी आहे. त्याच्या रक्षणाची माझी आणि डॉ. जयश्री पाटील यांची जबाबदारी आहे.’
‘मला आज असे सांगायचे आहे की, माझे मराठा भाऊ, जे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचे लाभार्थी आहेत, त्या लाभापासून कुणी त्यांना वंचित करण्याच्या दृष्टीने उभारलेले हे आंदोलन होते, असे मी समजतो. मात्र, आज आपण ते नोटिफिकेशन बघितले, तर ते नोटिफिकेशन नोटीस आहे. म्हणून एकूण सर्व बाबींना सोबत घेऊन, माननीय उच्च न्यायालयात लवकरात लवकर, म्हणजे मागास आयोगापासून ते अधिकारांच्या रक्षणापर्यंत काय काय सुरू आहे, या सर्व गोष्टींसाठी लवकरच न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल,’ असे गुुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.