पुणे : ‘सावळागा गं रामचंद्र, त्याचे अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या ओविचे हे चार अखंड चरण…’ या ओविंप्रमाणे भारतातील सोशिक, सात्विक परंपरेतील स्त्रिया कशाचाही विचार न करता आपले घर, परिवार उचलून धरतात. स्व. उर्मिलाताई कराड त्यातीलच एक होत्या. पूर्वीच्या काळात आमच्या बायका निरक्षर असतील पण परंतू त्या बुद्धिमान, प्रतिभावान होत्या. त्यांनी परिवारासाठी असंख्य गोष्टींचा त्याग करत आपला संसार मोठा केला.
त्यामुळे, पुरुष स्वप्नपूर्तीसाठी घराबाहेर पडत असताना स्त्रियांनी सक्षमपणे घर सांभाळल्यामुळे पुरुषांना वैभव प्रात्प झाले, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अरुणा ढेरे यांनी मांडले. त्या एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या उर्मिलाताई कराड सभागृहाच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.
या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, भारतीय सिने पत्रकार पद्मश्री भावना सोमाया, सुप्रसिद्ध लेखक व कवी इंद्रजीत भालेराव, तुळशीराम कराड, काशीराम कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, सौ.ज्योती अ.ढाकणे, डॉ.सुचित्रा उ.नागरे, सौ.पुनम आ. नागरगोजे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.राजेश एस ., आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.