नाशिक : विशेष प्रतिनिधी
एनडीए आघाडीला मोठा विजय मिळणार आहे, याची माहिती इंडिया आघाडीच्या मोठ्या नेत्याच्या विधानातून कळते. त्यांना माहीत आहे की, इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष काँग्रेस आहे. काँग्रेस प्रचंड प्रमाणात हारणार आहे. काँग्रेस विरोधी पक्षही बनू शकणार नाही. त्यामुळेच इथल्या नेत्याने त्यांनी सर्व छोट्या पक्षांना सल्ला दिलाय की, निवडणुका संपल्यानंतर सर्व छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचे आहे. म्हणजे आपले शटर बंद केले पाहिजे. त्यांना वाटते सर्व दुकान त्या दुकानात गेले तर काँग्रेस विरोधी पक्ष बनेल. ही यांची परिस्थिती आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रण धुडकावल्याजी त्यांनी जनतेला आठवण करुन दिली. काँग्रेसचे लोक मंदिरावरुन वेडेवाकडे काहीतरी बोलत असतात, असा आरोप त्यांनी केला. वीर सावरकरांना शिव्या देणा-या काँग्रेसला डोक्यावर घेतले जात आहे. राज्यातील स्वाभिमानी जनता हे पाहत आहे. राज्यातील लोकांचा राग वाढला आहे. काँग्रेसच्या पुढे गुडघे टेकणा-या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचे महाराष्ट्राने ठरवले आहे, असे ते म्हणाले.
मोदीजी आता कांद्यावर बोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिक आणि दिंडोरीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा पार पडली. या सभेत मोदींच्या भाषणाला सुरुवात झाली भाषण लयीत आल्यानंतर अचानक मोदी भाषण करताना थांबले. अनेकांना नेमकं काय झाले हे कळाले नाही. पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांनी मोदीजी आता कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी सुरु केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली त्यानंतर लगेचच मोदींचे भाषण पुन्हा सुरु झाले.