22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रलसूण कडाडला; किलो मागे ४०० रुपये

लसूण कडाडला; किलो मागे ४०० रुपये

- सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री - अवकाळी पावसाचा फटका

मुंबई : आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टींना आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक मानतो. पण यापैकी महत्त्वाच्या असलेल्या अन्नामध्ये कांदा आणि लसूण हे देखील तितकेच अविभाज्य घटक. कांदा किंवा लसूण खाद्यपदार्थात नसले तर अनेकांच्या जीभेला चव लागत नाही हे वास्तव आहे. प्रत्येक घराघरात, हॉटेलमध्ये कांदा आणि लसूण असणार नाही असं अपवादात्मक परिस्थितीत बघायला मिळेल. कांद्याने आतापर्यंत सर्वसामान्यांना भाववाडीतून सातत्याने रडवलं हे वास्तव आहे. त्यानंतर आता लसूण देखील रुसून बसणार आहे. बाजारात आता लसणाचे भावदेखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, महिला वर्ग नाराजी व्यक्त करण्याची दाट शक्यता आहे.

कांद्यापाठोपाठ आता लसूणही महागला आहे. प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडल्याने पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून २०० ते २५० रुपये किलो असलेला लसूण आता ३५० ते ४०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दादर बाजारपेठेत लसणाचे दर वाढल्याने व्यापारी वर्गातचिंतेचे वातावरण आहे.

अनेक हॉटेल आणि घरांमध्ये लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून काढून टाकण्यात येत आहेत. व्यापा-यांच्या म्हणण्यानुसार नवीन पीक बाजारात येण्यास वेळ लागेल आणि तोपर्यंत भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईतही लसणाचा भाव वधारला
दादर मार्केट पाठोपाठ नवी मुंबईच्याही बाजारात लसण्याच्या दरात वाढ झाली आहे. लसणाची आवक घटल्याने भावात वाढ झाल्याचं तिथेही बोललं जात आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने, लसणाच्या भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. या आठवड्यात लसणाच्या भावाने आणखी उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात चांगल्या दर्जाचा लसूण ३५० रुपये किलोपर्यंत गेला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाचा भाव प्रतिकिलो ४०० ते ४१० रुपये आहे.

कांद्याचे भाव घसरले
कांदा निर्यातबंदी लागू करण्यात आल्यानंतर व्यापा-यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. त्यासाठी कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. पंरतु नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजारसमित्यांमध्ये पुन्हा लिलावांना सुरुवात झाली. पण लिलाव जरी सुरु झाले तरी कांद्यांचे भाव मात्र घसरले. कांदा निर्यातबंदी निर्णयाच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून कांद्याचे बंद असलेले लिलाव शेतक-यांच्या मागणीनुसार आज सुरू झाले.पण कांद्याचे भाव घसरल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गचिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR