24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री सत्तार - खासदारांच्या व्हीडीओची काँग्रेसकडून चौकशीची मागणी

मंत्री सत्तार – खासदारांच्या व्हीडीओची काँग्रेसकडून चौकशीची मागणी

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले. त्यानंतर, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र, शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे एका घटनेवरून समोर आले आहे. हिंगोली जिल्ह्यात शिंदे गटात बेबनाव असल्याचे पाहायला मिळाले. मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्या शिवीगाळीवरून काँग्रेसने राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे. तसेच, हे सरकार टक्केवारीचे सरकार असल्याचेही त्यांनी म्हटले.

हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरुवातीलाच खासदार हेमंत पाटील यांनी निधी वाटप करताना टक्केवारीचे शेण खाल्ले जात असल्याचा आरोप करीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना थेट शिवीगाळ केली. त्यामुळे ऑनलाईन बैठकीत पाटील यांचा माईक म्यूट करून पुढील बैठक घेण्याची वेळ आली. मात्र, या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, माध्यमांतही याचे फुटेज पाहायला मिळाले. त्यामुळे, विरोधकांच्या हाती आयते कोलित सापडले. त्यावरून, माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी व्हीडीओ शेअर करत मंत्री अब्दुल सत्तारांच्या चौकशीची मागणी केली आहे.

एकमेकांना अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करणारे हे दोन्ही महोदय शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आहेत. एक महोदय शिंदेंच्या सरकारात मंत्री पदावर विराजमान आहेत, तर दुसरे हिंगोलीचे खासदार आहेत. यांच्यातल्या भांडणात अभद्र भाषेचा वापर तर खेदजनक आहेच; पण यापेक्षा ही एक बाब गंभीर असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

खासदार महोदयांनी भर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्र्यांवर निधीवाटप करताना टक्केवारीचं शेण खाल् ल्याचा गंभीर आरोप केला आहे. या बैठकीला इतर जनप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते. म्हणजेच शिंदे सरकारमधील मंत्री टक्केवारी घेऊन काम करतात हा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांच्या गटातील खासदारांनी लावला आहे. हे सरकार कसे भ्रष्टाचारयुक्त आहे, याबाबतचे खुलासे आम्ही विरोधकांनी वारंवार केले आहेत, पण आता तर मुख्यमंत्र्यांच्या गटातील खासदारानेच आपले सरकार टक्केवारी सरकार असल्याचे आरोप केले आहेत. याची तरी चौकशी होणार की नाही?, की चौकशीचा ससेमिरा फक्त विरोधकांचा आवाज दाबण्यासाठीच आहे?, असा सवाल आमदार वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून विचारला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR