नवी दिल्ली : रविवारच्या मोदी सरकार ३.० च्या शपथविधीनंतर सर्वांच्या नजरा खातेवाटपावर लागल्या होत्या. आज मोदी सरकारची पहिली बैठक पार पडली, यात खातेवाटप जाहीर करण्यात आले. त्यानुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, अमित शाह, राजनाथ सिंह आणि एस जयशंकर यांनाही त्यांचे पूर्वीचे खाते मिळाले आहे.
आज मोदी कॅबिनेटच्या बैठकीनंतर खातेवाटपाचा निर्णय घेण्यात आला. यात अमित शाह यांना गृह, राजनाथ सिंह यांना संरक्षण, नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक, अश्विनी वैष्णव यांना रेल्वे आणि जयशंकर यांना पुन्हा परराष्ट्र खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या खात्यात अजय टमटा आणि हर्ष मल्होत्रा यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मोदी सरकार ३.० मध्ये मंत्र्यांची एकूण संख्या ७१ आहे, पण त्यापैकी ३० मंत्री कॅबिनेटचा भाग असतील. याशिवाय ५ मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला असून ३६ खासदारांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. दरम्यान, आज झालेल्या मोदी कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पीएम आवास योजनेत वाढ करण्यात आली आहे. पीएम आवास योजनेंतर्गत देशभरात ३ कोटी नवीन घरे बांधली जातील. यापूर्वी ४.२१ कोटी घरे बांधली गेली आहेत.