मुंबई : नरेंद्र मोदी यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश इंडिया आघाडीला देखील दिला असून लोकसभेला आम्ही एकत्र लढलो, आघाडीतील प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ अशा सर्व राज्यात सर्वांनी एकमेकांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
लोकसभेपूर्वी मात्र बैठक होत होत्या, चर्चा होत होत्या, एकमेकांसोबत विचार विनिमय होत होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी मात्र, तसे झाले नाही. निवडणूक घोटाळे होत आहेत. महाराष्ट्रात देखील घोटाळा झाला होता. दिल्लीमध्ये देखील मोठा घोटाळा झाला आहे. केजरीवाल यांच्या मतदारसंघात देखील ३१ हजार नावे वगळण्यात आली आहेत. निवडणुकीत जय पराजय होत असतो. मात्र, इंडिया आघाडीने अनेक प्रश्नावर एकत्र येणे गरजेचे आहे.
तशी लोकांची भावना देखील आहे. निवडणूक व्यतिरिक्त देखील इंडिया आघाडीने एकत्र यायला हवा, अशी लोकांची भावना असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांचे कर्तव्य हे विधानसभा आणि लोकसभेत इतकेच रस्त्यावर देखील आहे. आज इंडिया आघाडी केवळ संसदेमध्ये दिसत आहे. इंडिया आघाडीने संसदेच्या बाहेर येणे देखील गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मोठा भाऊ म्हणून काँग्रेसने पुढाकार घेणे गरजेचे
इंडिया आघाडी मजबुतीने टिकायला हवी. तरच भाजप समोर आव्हान उभा करता येईल. असे आघाडीती प्रत्येक घटक पक्षाला वाटते. यात काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. मोठा भाऊ आहे. १०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मात्र आम्ही एकत्र असू त्याचवेळी ते शक्य असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोठा पक्ष म्हणून प्रत्येक बाबतीत काँग्रेस नेतृत्वाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत यांचा काँग्रेसच्या नेत्यांना टोला
इंडिया आघाडीतील काँग्रेसची भूमिका केवळ जागा वाटपात मोठ्या भावाची नको. तर समन्वयाचे काम काँग्रेसने ठेवायला हवे. केवळ जागा वाटपात मोठ्या भावाचे काम गरजेचे नसल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना टोला लगावला आहे. बिहार निवडणुकीमध्ये देखील स्थानिक आघाडीच्या बाबतीमध्ये तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि इतर छोटे पक्ष देखील सकारात्मक आहेत. कारण आम्ही लोकसभेला एकत्र येऊन करून दाखवले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.