नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये शुक्रवारी जोरदार धुळीचे वादळ निर्माण झाले होते. याचा फटका दिल्लीकरांना शनिवारी देखील बसल्याचे पाहायला मिळत आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक उड्डाणे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही उड्डाणे रद्द देखील करण्यात आली आहे.
खराब हवामानामुळे अनेक विमाने आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने विमानतळावर पोहोचली. या संदर्भात एअर इंडियाकडून शनिवारी आपल्या प्रवाशांसाठी एक ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. शनिवारी पुन्हा एकदा सायंकाळी ५:३० ते रात्री ९ च्या दरम्यान शहरात धुळीचे वादळ निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम हा विमान वाहतुकीवर पडू शकतो असे एअर इंडियाकडून आपल्या प्रवाशांना सांगण्यात आले आहे.
एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना अशी देखील विनंती केली आहे की, काही विमानांना त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा जास्त विलंब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आपल्या फ्लाईटच्या वेळेसंदर्भात अपडेट राहा. एअर इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन ठराविक अंतराने आपल्या विमानाच्या वेळेच्या स्थितीबाबत माहिती घ्या. खराब वातावरणामुळे प्रवाशांना जो त्रास होत आहे, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो असेही एअर इंडियाने म्हटले आहे.
वादळाची शक्यता
एअर इंडियाने यासंदर्भात माहिती देताना सांगितले आहे की, शुक्रवारी जसे धुळीचे वादळ निर्माण झाले होते, तसेच वादळ आज देखील सायंकाळी ५:३० ते रात्री ९ च्या दरम्यान पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर काही उड्डाणं वळवण्यात येतील याचा परिणाम हा एअर ट्रॅफिकवर पडू शकतो. त्याचा परिणाम म्हणून काही विमानांना विलंब देखील होऊ शकतो. आमची टीम याबाबत आढावा घेत आहे. परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल. प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
दिल्ली विमानसेवेवर परिणाम
शुक्रवारी दिल्लीमध्ये जोरदार धुळीचे वादळ आले, याचा मोठा परिणाम हा दिल्लीतील विमान सेवेवर झाला आहे. ५० पेक्षा जास्त देशांतर्गत विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आज देखील या धुळीच्या वादळाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.