नवी दिल्ली : २००८ मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्याबाबत पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांचे माजी सल्लागार आणि विद्यमान प्रवक्ते फरहतुल्ला बाबरने मोठा दावा केला आहे. जरदारी यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अण्वस्त्रांचा पहिला वापर न करण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याची गुप्तचर यंत्रणा आयएसआय संतापली होती आणि त्यानंतर काहीच दिवसांतच मुंबईवर हल्ला घडवण्यात आला असा दावा त्यांनी नव्या पुस्तकात केला आहे.
बाबर यांचे पुस्तक द जरदारी प्रेसिडेंसी नाऊ इट मस्ट बी टोल्ड या पुस्तकाच्या हवाल्याने एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यात कसे दिल्लीतील एका मीडिया संमेलनात भारतीय पत्रकार करण थापर यांना दिलेल्या सॅटेलाईट मुलाखतीत जरदारी यांनी भारताला अण्वस्त्रे पहिले न वापरण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे पाकिस्तानात काही गट संतापला होता. पाकिस्तान अण्वस्त्राचा पहिला वापर करणार नाही असे जरदारी यांनी म्हटल्याने पाकिस्तानी सैन्यात खळबळ माजली होती. या मुलाखतीच्या ४ दिवसानंतर २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर हल्ला झाला, ज्यात १६६ लोक मारले गेले असंही पुस्तकात म्हटले आहे.
शांततेच्या प्रयत्नांना चाप बसला
हा हल्ला पाकिस्तानी सैन्यातील आयएसआयची थेट प्रतिक्रिया होती. जेणेकरून भारतासोबत कुठल्याही संभाव्य शांतता प्रयत्नाला आळा बसेल. या हल्ल्यामुळे पुढील काही वर्ष दोन्ही देश युद्धाच्या जवळ आले होते आणि शांततेसाठी केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले होते असंही बाबर यांनी म्हटले आहे. परंतु रिपोर्टमध्ये केलेला दावा आणि प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या तथ्यांमध्ये ताळमेळ दिसत नाही. दाव्यानुसार, जरदारी यांनी शांततेच्या प्रस्तावाची ऑफर २२ नोव्हेंबरला दिली होती परंतु आयएसआयकडून ट्रेनिंग घेऊन हत्यारांसह लष्कर ए तोयबाचे १० दहशतवादी २१ नोव्हेंबरलाच कराचीहून समुद्री मार्गे मुंबईत दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी रवाना झाल्याचे बोलले जाते.

