मुंबई : प्रतिनिधी
नारायण राणेंची हकालपट्टी बाळासाहेबांना ब्लॅकमेल करून उद्धव ठाकरेंनी करायला लावली. ‘मातोश्री’तल्या अनेक गोष्टी अजून बाहेर आल्या नाहीत. अन्याय सहन करू नका ही बाळासाहेबांची शिकवण आहे, असे सांगत शिवसेना नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी बाळासाहेब ठाकरेंनी केली नाही. उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करायला लावली. मी या घटनेचा साक्षीदार आहे. राणेंना पक्षातून काढून टाका नाहीतर मी घर सोडून चाललो, नवरा-बायको दोघेही बॅगा भरून बाहेर निघाले होते. उद्धव ठाकरेंनी अक्षरश: बाळासाहेबांना ब्लॅकमेल केले आणि नारायण राणेंची हकालपट्टी करायला लावली फक्त याला मुख्यमंत्री व्हायचे होते. हे वास्तव आहे आणि मी साक्षीदार आहे. हे आज मी पहिल्यांदा बोललोय असा दावा कदमांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते
तसेच अनेक गोष्टी आहेत. ‘मातोश्री’तल्या अनेक गोष्टी बाहेर बोलत नाही, काही पथ्ये आम्हीही पाळतो. माझ्या मुलाला राजकारणातून मुळासकट उपटण्याचा प्रयत्न केला. मुलाला पुढे आणण्यासाठी शिवसेनाप्रमुखांसोबत काम केलेल्या नेत्यांची हकालपट्टी आणि बाजूला करून टाकले हे आम्हाला कळत नाही? प्रत्येक गोष्ट आम्हाला कळते. सहन होत नव्हते आणि सांगताही येत नव्हते. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितले, अन्याय सहन करू नका. अन्याय सहन करणाराही दोषी आहे, असे रामदास कदमांनी म्हटले.
दरम्यान, मुख्यमंत्री असताना अर्थ खात्याच्या फाईलींवर डोळे झाकून सह्या केल्या, आमच्या माणसाने सह्या केल्या, मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय एक पैसा पुढे जात नाही. उद्धव ठाकरे २ वर्षांत मंत्रालयात किती वेळा गेले? आम्ही अजितदादांना दोष देण्यापेक्षा आमचाच माणूस नालायक निघाला, म्हणजे त्या पदाला लायक नाही. आता एकनाथ शिंदेंच्या कारकीर्दीत एकदाही बातमी आली का, अजित पवारांनी या आमदारांना निधी दिला वगैरे, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून व्यवस्थित काम केले असते, कुणाला निधी देतोय हे पाहिले असते तर आज ही वेळ आली नसती, असे रामदास कदम यांनी सांगितले.