मुंबई : ओबीसी नेत्यांनी गेल्या पाच दिवसांपासून आपल्या मागण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. मात्र, राज्य सरकारने या आंदोलनाची कसलीच दखल घेतली नाही. यामुळे संतप्त झालेल्या ओबीसी नेत्यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात तेव्हा त्यांना रेड कार्पेट टाकलं जातं. तर आम्ही उपोषण करतो तेव्हा शासनाकडून आमची साधी दखलही घेतली जात नाही. हाच फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? असा सवाल ही ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला केला.
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी अंतरवली सराटीच्या वेशीवरील वडीगोद्री गावात मागील पाच दिवसापासून उपोषण सुरू केलं आहे. या पाच दिवसात त्यांनी पाणी सुद्धा घेतलेलं नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिले.
सर्व आंदोलनांना मिळावी सारखीच वागणूक-पंकजा मुंडे
दरम्यान, या प्रकरणावर भाजपच्या नेत्या पंकजा मुडे यांनी आज सोशल मीडियावरून राज्य सरकारला घेरले असून, ओबीसीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी वाघमारे यांची उपोषणाला बसल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीयार्ने पहावे, असं ट्विट पंकजा मुडे यांनी केले आहे.