लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील येळवस अर्थात वेळाअमावस्या आता लातूर जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख झाली आहे. ती सर्वदूर पोहोचली आहे. ही ओळख आणखी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी औसा तालुक्यातील येलोरी येथील शेतात जाऊन सप्त मातृकांचे पूजन करुन आंबिल, भज्जीचा आस्वाद घेतला. या वेळी नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंढे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांच्यासह विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे या लातूर जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असून त्यातील वेळाअमावस्या हा लातूर जिल्ह्यातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक रान महोत्सव आहे. या महोत्सवाबद्दल राज्यातील लोकांना आकर्षण निर्माण झाले आहे. येणा-या काळात विशेष नियोजन करून हा रान महोत्सव अधिक मोठ्या प्रमाणात प्रमोट करता येईल का, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईचे निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचे औसा तालुक्यातील येलोरी हे गाव असून त्यांच्या शेतात ही वेळाअमावस्या सर्वांनी साजरी केली. या वेळी गावचे सरपंच, नागरिक उपस्थित होते.