नाशिक : बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतक-यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे ठाकले आहे. कांद्याच्या निम्न दरामुळे शेतक-यांचा पुन्हा एकदा वांदा झाला आहे. नाशिक जिल्हा कांद्याची बाजारपेठ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. नाशिकमधील लासलगाव कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या लासलगावसह परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे.
कांद्याचे सरासरी बाजार भाव आठशे ते एक हजार रुपयांपर्यंत खाली कोसळले आहे. वाढत्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. यंदा उन्हाळी कांद्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. तसेच यंदा कांद्याचे दर कोसळले आहे.
एप्रिल महिन्यात पडलेल्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची प्रतवारी खराब होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता कांदा उत्पादक शेतकरी आपला कांद्याची प्रतवारी करुन साठवणूक करत आहेत. तसेच ज्यावेळेस कांद्याच्या बाजारभावात वाढ होईल, त्यावेळेस हा साठवणूक केलेला कांदा बाजारात विक्रीसाठी आणला जाईल असे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहे.
दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी लासलगाव बाजार समितीत भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतक-यांशी संवाद साधत केंद्र सरकार टीका केली होती. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळेच कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होत आहे. गेल्यावेळी प्रोडूसर कंपन्यांमार्फत खरेदी करत मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्यामुळे नाफेडने थेट बाजार समितीत उतरून कांद्याची खरेदी केली पाहिजे. शेतक-यांजवळ असलेली विजेची थकबाकी ही शेतक-यांचीच आहे का? तितकी वीज शेतक-यांनी वापरली आहे का? त्याची तपासणी केली पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
आवक २ लाख क्विंटलच्या वर
मागील आठवडाभरातील राज्यात कांद्याची आवक २ लाख ३७ क्विंटल झाली होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक १ लाख ४४ हजार क्विंटलची आवक झाली. या आठवड्यात उन्हाळी कांद्याला कमीत कमी ८४० रुपये तर जास्तीत जास्त १२५० रुपये दर होता.
अवकाळीचा मोठा फटका
अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. तसेच यंदा कांद्याचे दर कोसळले असून सरासरी ८०० ते १००० रुपये क्विंटल दराने कांदा विकल्या जात आहे. एप्रिल महिन्यात पडलेल्या उन्हामुळे शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची प्रतवारी खराब झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे.