नाशिक : यंदा कांद्याने शेतक-यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. शेतक-यांच्या घरातील शुभकार्य कांद्यामुळे रखडले आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीनंतर तुळशी विवाह झाल्यानंतर धुमधडाक्यात लग्नसराईला सुरुवात होते. हा कांदा उत्पादक शेतक-यांसाठी सुगीचा असतो. कारण कांद्याला नोव्हेंबर महिन्यात ३८०० शेती ४२०० रुपये प्रति क्विंटल चांगला बाजारभाव मिळतो. यामुळे या हंगामात मिळणा-या पैशांमुळे कांदा उत्पादक शेतकरी मुलामुलींचे लग्न जमवतात. परंतु यंदा सर्व गणित उलटे झाले आहे. यंदा कांद्याला भाव नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. आर्थिक टंचाईमुळे त्यांच्या घरातील लग्न आणि इतर शुभकार्य रखडले आहेत.
कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर कांद्याचे बाजार भाव १८०० ते २००० रुपयांपर्यंत खाली आले. कांदा उत्पादक शेतक-यांना प्रती क्विंटल मागे दोन हजार रुपयांचा तोटा झाला. यामुळे प्रत्येक शेतक-याचे हंगामात दीड ते ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान होत आहे. कुटुंबाचे उदरनिर्वाह करायचे की मुला मुलींचे लग्न करायचे अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. यामुळे शेतक-यांनी मुला, मुलींची लग्न पुढे ढकलली आहे. बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आलेल्या कांदा उत्पादकांनी व्यापा-यांशी बोलताना ही माहिती दिली.
नाशिक जिल्ह्यात ५५० कोटींचे नुकसान
कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांचे ५०० ते ५५० कोटींचे तर राज्यातील शेतक-यांचे १२०० ते १५०० कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे केंद्र सरकारने आतातरी निर्यातबंदी मागे घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
बंदचा निर्णयाकडे शेतक-यांनी फिरवली पाठ
शेतीमालाच्या बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचे हस्तक्षेप वाढल्याने याला विरोध करण्यासाठी नाशिक येथे झालेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत ८ जानेवारीपासून सर्व शेतकरी हे संपावर जातील असा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाकडे कांदा उत्पादक शेतक-यांनी पाठ फिरवली.