छ. संभाजीनगर : सध्या राज्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी डोक्यावर हंडे, घागरी दिसत आहेत, तर काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत. दरम्यान, सध्या राज्यातील पाणीसाठा हा २८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर मराठवाड्यातील पाणीसाठा १२ टक्क्यांवर आला आहे. अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे.
राज्यातील पाण्याची समस्या गंभीर होत आहे. पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. तसेच धरणातील पाणीसाठ्यात देखील झपाट्याने घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मराठवाड्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. सध्या जायकवाडीत फक्त ७.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात निम्म्याहून अधिक धरण भरलेले होते.
बीड, धाराशिव आणि लातूरमध्ये अनेक छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील धरणसाठा २३ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याचवेळी जलसाठा ३० टक्के होता. दरम्यान, कोयना धरणात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोयनेतून होणा-या वीजनिर्मितीत देखील घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील मे महिन्यात ३०.४३ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. तर गंगापूर धरणात ४४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरीकडे भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांच्या खाली आहे.
दरम्यान, विदर्भासाठी दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे विदर्भातील धरणांमध्ये ब-यापैकी पाणीसाठा आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. नागपूर विभागात जलसाठा ४० टक्क्यांवर तर अमरावती विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा ४४ टक्क्यांवर आला आहे. तर कोकणातील पाणीसाठा ४२ टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे.