धाराशिव (विशेष प्रतिनिधी, अय्यूब कादरी): धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकाच विषयाची सर्वात मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची. सतत निष्ठेचा दाखला देणारे आणि त्याद्वारे मतदारांची सहानुभूती मिळवणाऱ्या ओमराजेंनी अखेर उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. लोकसभेत स्वतंत्र गटाची मागणी करणाऱ्या ठाकरे गटाच्या ६ खासदारांमध्ये ओमराजेंचे नाव समोर आल्याने, जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम तर शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
गतवर्षीची हतबलता आणि सोशल मीडियाचा फुगा
हा संपूर्ण प्रसंग पाहता गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२५ च्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाची आठवण येते. ध्वजारोहण झाल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी माध्यमांसमोर येत विरोधकांनी आपला व्हॉट्सॲप हॅक केल्याचा आरोप केला होता. माझी बदनामी करण्यासाठी विरोधकांनी मोहीम उघडल्याचा दावा त्यांनी केला होता. ज्या ओमराजेंचे संपूर्ण राजकारणच सोशल मीडिया आणि जनसंपर्कावर अवलंबून आहे, त्यांनी असा दावा करणे हास्यास्पद मानले गेले. वास्तविक पाहता, तो विषय निव्वळ तांत्रिक नव्हता, तर तो त्यांच्या हतबलतेचा होता. मतदारसंघात त्यांच्या निष्क्रियतेबद्दल आणि विकासकामांच्या अभावाबद्दल लोकांमध्ये सुरू झालेल्या चर्चेमुळे ही हतबलता आली होती. आता त्याला वर्ष पूर्ण व्हायच्या आतच त्यांनी थेट पक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याने त्यांच्या कथित निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
निष्ठा आणि वक्तृत्वाची ताकद की निव्वळ सहानुभूती?
ओमराजेंची वक्तृत्वशैली अफाट आहे आणि त्यांचे राजकारण टिकून राहण्यात याचा मोठा वाटा आहे. २०२२ मध्ये जेव्हा शिवसेनेत मोठी फूट पडली आणि जिल्ह्यातील दिग्गज नेते उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेले, तेव्हा ओमराजे ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. संकटकाळात साथ न सोडल्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या विकासकामांचा विचार न करता, केवळ ‘संकटात एकट्याने किल्ला लढवणारा निष्ठावंत’ म्हणून त्यांच्या पारड्यात मते टाकली आणि त्यांना दणदणीत विजय मिळवून दिला. परंतु, आता ठाकरेंची साथ सोडल्यास ती सहानुभूती ते कायमची गमावणार आहेत. “विरोधात राहून विकासकामे होत नाहीत, मतदारसंघासाठी निधी आणायचा आहे,” असा युक्तीवाद आता ओमराजेंकडून केला जाण्याची शक्यता आहे. हा युक्तीवाद काही अंशी मान्य केला, तरी “मग आतापर्यंत मारलेल्या तुमच्या निष्ठेच्या गप्पांचे काय?” हा प्रश्न ओमराजेंची पाठ सोडणार नाही.
राणाजगजितसिंह पाटलांचे राजकारण ‘सेफ’ आणि भक्कम
दुसरीकडे, धाराशिव जिल्ह्यात भाजपचे संघटन अत्यंत मजबूत असून तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नेतृत्व अधिक ठळक झाले आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राणाजगजितसिंह पाटील आता पक्षात पूर्णपणे सेट झाले असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, बहुतांश पंचायत समित्या आणि नगरपरिषदा त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात आहेत.
भाजप-महायुती सरकारच्या पाठबळामुळे जिल्ह्यात सध्या अनेक मोठी विकासकामे दृश्य स्वरूपात सुरू आहेत. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम असो, श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा असो किंवा कृष्णा खोऱ्याचे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जिल्ह्यात आणण्याचा विषय असो, या सर्व कामांचा पाठपुरावा आमदार पाटील यांनी केला आहे. याशिवाय मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, विश्वकर्मा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि पीएम स्वनिधी यांसारख्या योजनांमधून त्यांनी हजारो लोकांना थेट लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे “जिल्ह्याचा खरा नेता कोण?” या प्रश्नाचे उत्तर आज घडीला आमदार राणाजगजितसिंह पाटील असेच मिळते.
पक्षांतर केल्यास ओमराजे संकटात सापडणार?
ओमराजे आपले सेट झालेले राजकारण सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत, परंतु तिथे त्यांना स्वतःची जागा बनवायला मोठा कालावधी लागणार आहे. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, शिंदे यांच्या नगरविकास खात्याची कोणतीही फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडून व्हेरीफाय झाल्याशिवाय पुढे जात नाही. अशा स्थितीत निधीसाठी ओमराजेंना मुख्यमंत्र्यांवरच अवलंबून राहावे लागेल आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना टाळून मुख्यमंत्री ओमराजेंना थेट मदत करतील, याची शक्यता फार कमी आहे. या परिस्थितीचा अंतिम फायदा आमदार पाटील यांनाच होणार आहे.
शिंदे गटात अंतर्गत गटबाजी वाढणार?
ओमराजेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाल्यास धाराशिव जिल्ह्यात पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटातील जुने नेते जसे की माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, उमरग्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि कळंबचे अजित पिंगळे हे ओमराजेंचे नेतृत्व सहजासहजी स्वीकारतील का, हा मोठा प्रश्न आहे.
सर्वात मोठी ताकदच होणार निष्प्रभ
उद्धव ठाकरेंवरील निष्ठा, लोकांसोबतचा थेट संपर्क आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबीयांवर केलेली सडकून टीका या तीन प्रमुख मुद्द्यांवर ओमराजेंचे राजकारण आजवर टिकून राहिले. आता ते स्वतः सत्ताधारी पक्षात सामील होत असल्याने ठाकरेंप्रती असलेली निष्ठा आणि पाटील कुटुंबीयांवरील टीकेची धार हे दोन्ही मुद्दे निष्प्रभ ठरणार आहेत. पक्षांतर केल्यास ओमराजे राजकीयदृष्ट्या मोठ्या संकटात सापडतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. आता त्यांच्या या निर्णयाचा खरा कौल जाणून घेण्यासाठी २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
















