21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रभागवत सप्ताहामध्ये ३०० हून अधिक भाविकांना भगरीतून विषबाधा

भागवत सप्ताहामध्ये ३०० हून अधिक भाविकांना भगरीतून विषबाधा

लोणार : उपवासादरम्यान प्रामुख्याने भगर खाल्ली जाते. मात्र, हीच भगर भाविकांच्या जिवावर उठली असल्याचे चित्र लोणार तालुक्यात पाहायला मिळाले. मंगळवारी जया एकादशी दिवशी भगर खाल्ल्यामुळे सुमारे ३०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लोणार तालुक्यातील सोमठाणा येथे भागवत सप्ताह सुरू आहे. दरम्यान मंगळवारी एकादशी असल्याने रात्री भाविकांना भगर आणि शेंगदाणा आमटी फराळ म्हणून देण्यात आला होता. हा प्रसाद खाल्ल्यानंतर रात्री अनेकांना उलट्या सुरू झाल्या. यात सोमठाणा खापरखेड आणि आजूबाजूच्या गावातील भक्तांना विषबाधा झाली आहे. एकूण २०० भाविकांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अनेकांना इतरत्र उपचारार्थ हलवण्यात आले आहे. तर विषबाधित रुग्णांची नावे कळू शकली नाहीत.

लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल ३०० पेक्षा जास्त भाविकांना विषबाधा झाली आहे. रुग्णांना मेहेकर, सुलतानपूर, लोणार, अंजनी खुर्द या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे पोलिस आणि महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले.

धक्कादायक बाब अशी की, या ग्रामीण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार देण्यात आले. पोलिस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न करत असताना, आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. सकाळपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR