सातारा : पहलगाम हल्ला हा केंद्र शासनाचे अपयश आहे. आजवर केंद्र शासनाकडून काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे. दहशतवादी घटना संपुष्टात आल्या आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र शासनाचे सर्व दावे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पोकळे ठरले आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला तेथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती याचे आश्चर्य वाटते. याचा अर्थ आपली यंत्रणा किती गाफील आहे हे स्पष्ट होते. जयंत पाटील म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ला विषयावर राजकारण न करता ठोस पावले उचलली जावी. हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे. संबंधित दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
देशाच्या आत हल्ला होतो हे धक्कादायक वाटते
जयंत पाटील म्हणाले की, दहशतवादी सहजपणे मोठ्या संख्येने पर्यटक असलेल्या ठिकाणी पोहोचतात. निरपराध आणि बेसावध पर्यटकांवर हल्ला करतात, हे सर्व धक्कादायक वाटते. लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना सीमेहून देशाच्या आतील भागात ३०० किलोमीटर अंतरापर्यंत देखील हल्ला होऊ शकतो, याचा अंदाज असायला हवा होता.