मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा बसल्या जागी पुरविण्यासाठी आणि सरकारी कार्यालयातील येणा-या अडचणींच्या तक्रारी करण्यासाठी सरकारने आपले सरकार पोर्टल व मोबाईल अॅप ही सेवा सुरू केली आहे.
अनेकदा या पोर्टलवरुन सेवा उपलब्ध करताना किंवा तक्रारीचा निपटारा करताना प्रशासकीय अधिकारी व कर्मचा-यांकडून दिरंगाई केली जाते. आता, आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणा-या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दरदिवशी १ हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत १०२७ सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी ५२७ सेवा ‘आपले
सरकार’ पोर्टलवर उपलब्ध आहेत.
प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात. यात दिरंगाई करणा-या प्रशासकीय विभाग प्रमुखाला दरदिवशी १ हजार रुपयांचा दंड लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. त्यामुळे, आपले सरकार पोर्टवरील शासकीय सेवा अधिक गतीमान होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात विविध सामाजिक क्षेत्रांची वॉररुम बैठक आज संपन्न झाली. त्यामध्ये, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आपले सरकार पोर्टलच्या तक्रारी आणि त्यावर होत असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने देखील चर्चा झाली.
या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन, अॅग्रीस्टॅक उपक्रम यांचा आढावा मुख्यमंर्त्यांनी घेतला. आपले सरकार पोर्टलवर विविध विभागांच्या १३८ इंटिग्रेटेड सेवा ३१ मे २०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिल्या. तसेच उर्वरित ३०६ अधिसूचित सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कराव्यात. त्याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यास दिरंगाई करणा-या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दरदिवशी १ हजार रुपयांचा दंड लावण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देशच मुख्यमंर्त्यांनी सचिवांना दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशामुळे आता प्रशासन अधिक गतीमान होऊन नागरिकांच्या स्थानिक विभागासंदर्भातील तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा होण्यास मदत मिळणार आहे.
काय आहे आपले सरकार?
‘आपले सरकार’ हा महाराष्ट्र, सरकारचा एक उपक्रम आहे, ज्याचा उद्देश नागरिकांना अधिक कार्यक्षमतेने आणि पारदर्शकपणे विविध सरकारी सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणे आहे. आपले सरकार पोर्टलद्वारे, नागरिक प्रमाणपत्रे, परवाने, आणि इतर विविध प्रकारच्या सेवांसाठी अर्ज करू शकतात. त्यात तक्रार निवारण यंत्रणा देखील समाविष्ट आहे, जिथे लोक सरकारी कार्यालयासंदर्भात तक्रारी किंवा त्यांना सरकारी सेवांबाबत भेडसावणा-या समस्या नोंदवू शकतात. प्रशासनाला नागरिकांच्या जवळ आणण्यासाठी आणि सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देण्याची गरज कमी करण्यासाठी या पोर्टलला बनवण्यात आले आहे. मोबाईल अॅप आणि पोर्टलद्वारे ही सेवा कार्यरत आहे.