ग्वाल्हेर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा सध्या मध्य प्रदेशात पोहोचली आहे. यावेळी राहुल यांनी अनंत अंबानी यांच्या लग्नावरुन सरकारवर जोरदार घणाघात केला. अंबानींच्या घरात लग्न आहे, तिथे लोक सेल्फी काढत आहेत आणि तुम्ही इथे उपाशी मरत आहात अशी टीका राहुल यांनी केली.
ग्वाल्हेरमध्ये लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी काय बोलत आहेत, ते कुठे दाखवणार? सध्या टीव्हीवर फक्त अंबानींच्या मुलाचे लग्न दाखवले जात आहे. लग्न मोठ्या थाटामाटात सुरू आहे, जगभरातून लोक येत आहेत, सेल्फी काढत आहेत आणि तुम्ही लोक इथे उपाशी मरत आहात असंही राहुल यावेळी म्हणाले. राहुल गांधी पुढे म्हणतात भारत जोडो यात्रेनंतर आम्ही भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली. या प्रवासात आम्ही ‘न्याय’ हा शब्द जोडला, कारण देशात पसरत असलेल्या द्वेषाचे कारण अन्याय आहे. सध्या देशातील बेरोजगारी ४० वर्षांतील सर्वात जास्त आहे. भारतात पाकिस्तान, बांगलादेश आणि भुटानपेक्षा जास्त बेरोजगारी आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी आणि नोटाबंदीच्या माध्यमातून छोटे उद्योग उद्ध्वस्त केले.
जात जनगणनेवर पुनरुच्चार
यावेळी राहुल यांनी पुन्हा एकदा जात जनगणनेच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. देशात सुमारे ५०% ओबीसी, १५% दलित आणि ८% आदिवासी लोक आहेत. देशातील मोठमोठ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात ओबीसी, दलित आणि आदिवासी वर्गातील एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार देशातील ७३% लोक मोठ्या रुग्णालये आणि खाजगी शाळांच्या व्यवस्थापनात दिसत नाहीत, परंतु मनरेगा आणि कंत्राटी कामगारांच्या यादीत दिसतील. पूर्वी सरकारी नोक-या होत्या, त्यामुळे या ७३% लोकांचा सहभाग असायचा, आता सर्व काही खासगी केले जात आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.