लाहौर : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या १० दिवसानंतरही भारताची भीती पाकिस्तानच्या मनातून जात नाही. भारताच्या इशा-यानंतर आणि कारवाईमुळे पाकिस्तान वॉर मोडमध्ये आला आहे. भारतीय सैन्याच्या संभाव्य कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानने पीओकेमध्ये बंकर खोदकाम सुरू केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना घरे खाली करण्यास सांगून तिथे सैन्य चौकी बनवली जात आहे. युवकांना हत्यारांचे ट्रेनिंग देणे सुरू झाले आहे. खैबर पख्तूनख्वासारख्या संवेदनशील भागात वॉर सायरनही लावण्यात आलेत.
सूत्रांनुसार, पाकिस्तानी सैन्याने पीओकेमध्ये गुप्त बंकर तयार केलेत. सर्वसामान्य लोकांच्या घरांवर कब्जा करून तिथे सैन्य छावणी उभारली जात आहे. गिलगित-बालिस्टानच्या युवकांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. भारताने पाकविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यापासून पाकिस्तानात थयथयाट माजला आहे. पाकिस्तान सातत्याने भारताला पोकळ धमकी देत जगातील इतर देशांकडे सुरक्षेची भीक मागत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान अलीकडेच तुर्कीच्या राजदूतांना भेटले. भारत युद्ध थोपवत असल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला आहे.
अब्दाली फेल
शनिवारी पाकिस्तानने ४५० किमी रेंजची अब्दाली बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी केल्याची माहिती आहे. परंतु वास्तवमध्ये भारताच्या अग्नी मिसाईलसमोर पाकिस्तानची ही मिसाईल काहीच नाही, ना पाकची मिसाईल भारताला नुकसान पोहचवण्यात सक्षम आहे. अब्दालीच्या ४५० किमी रेंज असणा-या मिसाईलच्या तुलनेने भारताची अग्नी मिसाईल ४ हजार किमी हून अधिक रेंजची आहे.
पाक एअरफोर्सकडून युद्ध सराव
सध्या पाकिस्तानी एअरफोर्सकडून ३ मोठे युद्ध सराव सुरू आहेत. ज्यात एफ१६, जे १०, जेएफ१७ सारख्या लढाऊ विमानांचा समावेश आहे. पाकिस्तानने राजस्थाननजीक लॉन्गेवाला सेक्टरमध्ये आधुनिक रडार तैनात केली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतात वॉर सायरन वाजवले जात आहेत.