28.8 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeराष्ट्रीयदिल्लीच्या धर्तीवर बिहार काबीज करण्याची योजना

दिल्लीच्या धर्तीवर बिहार काबीज करण्याची योजना

२ कोटी बिहारींसाठी भाजपचा मेगा प्लॅन

पाटणा : वृत्तसंस्था
भाजपने सलग तीन वेळा देशाची सत्ता काबीज केली, पण बिहारमध्ये त्यांना स्वबळावर सरकार बनवता आलेले नाही. जाती-धर्माच्या राजकारणाने वेढलेल्या बिहारमध्ये भाजपला सातत्याने नितीशकुमारांचा टेकू घ्यावा लागत आहे. पण, आता भाजपने राज्यात स्वबळावर सत्ता काबीज करण्याच्या दिशेने मार्गक्रमण केल्याचे पाहायला मिळत आहे.

सात महिन्यांनी होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आतापासूनच तयारीला लागला आहे. नितीश मंत्रिमंडळाच्या विस्तारातून भाजपने आधीच आपली पॉवर दाखवली आहे. आता भाजपने बिहारबाहेर राहणा-या बिहारी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

बिहारच्या सत्तेने अनेकदा भाजपाला हुलकावणी दिली आहे. पण, आता बिहार काबीज करण्यासाठी भाजपने नव्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत, स्रेह मिलन’ कार्यक्रमांतर्गत भाजपने देशभरात राहणा-या बिहारी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दिल्ली निवडणुकीच्या ‘चोखा-बाटी’ मोहिमेपासून प्रेरणा घेत भाजप एनआरआय बिहारींचा पाठिंबा मिळवण्यासाठी विविध शहरांमध्ये सभा घेणार आहे. २२ मार्च रोजी बिहार दिनानिमित्त भाजप या योजनेचा शुभारंभ करणार आहे. २२ मार्च ते ३० मार्च या कालावधीत भाजप नेते देशातील विविध राज्यात राहणा-या बिहारमधील लोकांच्या बैठका घेणार आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पूर्वांचली मतांचा विश्वास जिंकण्यासाठी भाजपने ‘चोखा-बाटी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने दिल्लीत राहणा-या बिहारच्या जनतेशी संवाद प्रस्थापित करण्यात भाजप नेत्यांना यश आले आणि आता त्याच धर्तीवर देशभरात राहणा-या बिहारी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परदेशात राहणा-या बिहारमधील लोकांसोबत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी देखील भाजप एक टीम तयार करणार आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी एक टीम असेल, जी प्रमुख शहरे आणि भागात संवाद स्थापित करण्याचा प्रयत्न करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR