मुंबई : प्रतिनिधी
मुंबई नको बॉम्बे च हवे यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केला. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे सूतोवाच करत ठाकरे यांनी याप्रश्नी मराठी माणसाला जागे राहण्याचेआणि डोळे उघडण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयोजित आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसेच ठेवले, त्याचे मुंबई केले नाही, हे चांगले झाले असे विधान केले. त्यांच्या या विधानावर राज ठाकरे यांनी आज एक्स या समाज माध्यमात पोस्ट करून टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असताना भाजपच्या मंत्र्याने मुंबईवरून वादग्रस्त विधान केल्याने त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.
जितेंद्र सिंग यांचे विधान हे सरकारच्या मानसिकतेचे एक प्रतीक आहे. आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. मुंबई नको बॉंबेच हवे यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केले आहे हे आपण रोज पाहतो आहोतच. आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवे असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई जी मराठी माणसाची होतीच, तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळे करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे. खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चालले आहे ते ओळखून तसे बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे, असल्याचे ठाकरे नमूद केले आहे.
या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणा-या तमाम मराठी जणांना माझे आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना मुंबई हे नाव खटकते कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून घेतले आहे. त्या देवीची सगळी लेकरे म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसे. तुम्ही आणि तुमचे शहर यांना खुपत आहे असा आरोपही ठाकरे यांनी केला आहे.

